स्वतःला ओळखून ‘करिअर’चे क्षेत्र निवडा

स्वतःला ओळखून ‘करिअर’चे क्षेत्र निवडा

07062

स्वतःला ओळखून ‘करिअर’चे क्षेत्र निवडा
डॉ. अविनाश धर्माधिकारी; देशसेवेचे ध्येय उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः करिअरच्यादृष्टीने पाहता माझ्या मते सर्व क्षेत्रे समान आहेत. स्वतःची गुणसंपदा, स्वभाव ज्या क्षेत्रासाठी योग्य आहे. ते क्षेत्र आपल्या करिअरसाठी योग्य ठरते. त्यामुळे स्वतःला ओळखून करिअरचे क्षेत्र निवडा. देश आणि लोकसेवेचे ध्येय उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करा, असे आवाहन चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक डॉ. अविनाश धर्माधिकारी यांनी रविवारी येथे केले.
‘सकाळ एज्युकेशन’ महायात्रेमध्ये त्यांनी ‘दहावी, बारावीनंतरचे करिअर, स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास’ याविषयावर मार्गदर्शन केले. कळत-नकळतपणे आपण सर्वांनी सायन्स, कॉमर्स, आर्टस अशी करिअरची उतरंड रचली असून, ती चुकीची आहे. केवळ परीक्षेतील गुण म्हणजेच बुद्धिमत्ता समजण्याचे चुकीचे असून, हे विद्यार्थी, पालकांनी लक्षात घ्यावे. प्रत्येकाची बुद्धिमता वेगवेगळी असते. त्यामुळे आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते शोधून त्यामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर करावे. स्वतःला ओळखून करिअरचे क्षेत्र निवडून त्यामध्ये उत्तम काम करत प्रतिभावंत व्हावे. आई-वडील, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या मताऐवजी स्वतःला काय येते हे जाणून घेवून जीवनाची इमारत उभी करावी, असे आवाहन डॉ. धर्माधिकारी यांनी केले. यावेळी युपीएससी परीक्षेत यशस्वी ठरलेले निहाल कोरे (मिरज), अक्षय नेर्ले ( दत्तवाड, कोल्हापूर) प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, सर्जेराव म्हातुगडे यांनी फोर्ट इंटरनॅशनल ॲकॅडमीची, तर मयूर पाटील यांनी चाणक्य मंडल परिवाराची उपस्थितांना माहिती दिली.
.......
डॉ. धर्माधिकारी म्हणाले
*विश्‍वकल्याणाची प्रार्थना ही जगण्याच्या मुळाशी असून, त्याने जीवन आनंददायी बनते
*स्वतःमधील चैतन्याने कार्यरत राहिल्यास अधिक चांगले काम होते
*परीक्षेतील गुण हे बुद्धिमत्तेचे मोजमाप नाही
*करिअर निवडताना आपण सहजपणे कशात रमतो ते बघा
*आपले काम उत्तम करणे हीच देवपूजा, देशसेवा आहे

चौकट
स्पर्धा परीक्षेचे ‘पंचशील’
स्पर्धा परीक्षेतील करिअरमधून आपल्याला पंचशील मिळते. त्यात प्रामाणिक मार्गाने मिळणारा पैसा, सुरक्षितता, समाजातील स्थान, अधिकार, देश आणि लोकांची सेवा करण्याची संधी यांचा समावेश आहे. त्यामुळे देश, लोकसेवेचे ध्येय उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असे डॉ. धर्माधिकारी यांनी सांगितले.

चौकट
‘आम्हाला ‘कॉपी’ करू नका’
‘युपीएससी’तील गुणवंत निहाल कोरे आणि अक्षय नेर्ले यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेत करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर योग्य मार्गदर्शकांच्या पाठबळावर पुढील वाटचाल करा. अभ्यासात सातत्य ठेवा. पदवीच्या अंतिम वर्षात असतानाच स्पर्धा परीक्षा देणे सुरू करा. व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्या, असा सल्ला कोरे यांनी दिला. स्पर्धा परीक्षा ही केवळ बुद्धिमत्तेची चाचणी नव्हे, तर सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची परीक्षा आहे. त्यामुळे यातील यशासाठी महाविद्यालयीन जीवनापासून पक्की तयारी करा. शिक्षणाबरोबर विविध उपक्रमांमध्ये सहभागी होवून व्यक्तिमत्व विकास करा. चांगल्या मित्रांमध्ये रहा. सर्वात महत्त्वाचे आम्हा यशस्वितांना ‘कॉपी’ करू नका. स्वतःमधील ‘स्व’ ओळखून तयारी करा, असे आवाहन नेर्ले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com