‘वाचनवाटा‘ पुस्तक प्रकाशन

‘वाचनवाटा‘ पुस्तक प्रकाशन

09244

अभिजात साहित्य वाचूया, इतरांनाही सांगूया
किशोर कदम ः आदिनाथ चव्हाण यांच्या ‘वाचनवाटा‘ पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः जगभरातील अभिजात साहित्य वाचले पाहिजे आणि तिथेच न थांबता त्याचा आनंद इतरांनाही देता आला पाहिजे. या साहित्यिक आदान-प्रदानातूनच माणूस म्हणून समृद्ध होण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असे स्पष्ट मत आज प्रसिद्ध कवी, अभिनेते किशोर कदम यांनी व्यक्त केले. ‘सकाळ-ॲग्रोवन''चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण लिखित ‘वाचनवाटा’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. सकाळ प्रकाशनातर्फे राजर्षी शाहू स्मारक भवनात हा दिमाखदार प्रकाशन सोहळा झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक अविनाश सप्रे होते.
`पुस्तकं’या स्वतःच्या मुलासाठी लिहिलेल्या कवितेचे सादरीकरण करत श्री. कदम यांनी संवादाला प्रारंभ केला. ते म्हणाले, ‘‘चांगल्या वाचकांची नवी पिढी निर्माण करणे आवश्यक आहे. वाचनातूनच त्यांच्या जगण्याला खऱ्या अर्थाने समृद्धता येईल. आपल्याला जे जे साहित्य आवडते ते आपण जितके इतरांना सांगू किंवा वाचून दाखवू त्यातून मिळणारे समाधान मोलाचे असते.’’
ज्येष्ठ समीक्षक सप्रे म्हणाले, ‘‘पुस्तके, प्राणी आणि झाडांबरोबर आपण जगले पाहिजे. जगभरातील चांगल्या साहित्याशी ‘वाचनवाटा‘ने साऱ्यांना जोडले आहे. पुस्तकांच्या निवडीतून लेखकाची अभिरूची दिसते. अभिजात पुस्तकांच्या परिचयाबरोबरच त्यावर आधारित विविध सिनेमे, त्या त्या अनुषंगाने विविध गझला, गीतांसह केलेले विश्लेषण यामुळे या पुस्तकाची उंची वाढली आहे. ज्या भाषेत लोकप्रिय साहित्य अधिक वाचले जाते, त्या भाषेतील गंभीर साहित्यालाही चांगला वाचक मिळतो.’’
ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर म्हणाले, ‘‘आजही राज्यातील चोवीस जिल्ह्यात पुस्तकांचे एकही सुसज्ज दुकान नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर शेतीसाठी वाहिलेल्या ‘ॲग्रोवन''मधून जागतिक साहित्यावर लेखन होते आणि पुढे ते पुस्तक रूपाने वाचकांच्या भेटीस येते, ही गोष्टच कौतुकास्पद आहे. जगभरातील अभिजात साहित्याचा फेरफटका या पुस्तकांतून घडतो. मात्र, त्याचवेळी मुळ साहित्य वाचण्यासाठीची प्रेरणाही त्यातून इतरांना मिळते.’’
संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण यांनी वाचनाचे वेड, पत्रकारिता आणि पुस्तकाच्या निर्मितीपर्यंतच्या विविध आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘‘सध्याचा बदलाचा वेग थक्क करणारा आहे आणि तो पेलण्याचे सामर्थ्य वाचनामुळेच मिळाले. शिरोळमधील राजर्षी शाहू नगर वाचनालामुळे वाचनाकडे वळलो आणि पुढे हा संस्कार जगण्याचा अविभाज्य भाग बनला. इतिहासाचा अभ्यास खूप आवश्यक असून, त्यातूनच वर्तमानात आपली पावलं स्थिर राहतील आणि भविष्याचा वेधही घेतील.’’
सकाळ प्रकाशनाच्या संपादक दीपाली चौधरी यांनी प्रास्ताविकात सकाळ प्रकाशनाच्या गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. ‘वाचनवाटा‘ या पुस्तकांवरच्या पुस्तकाला वाचकांचा नक्कीच मोठा प्रतिसाद मिळेल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, ‘सकाळ''चे उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत झाले. सिंधू चव्हाण यावेळी उपस्थित होत्या. अमृता दैनी यांनी पुस्तकातील काही लेखांचे अभिवाचन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट
‘शाहू-फुले-आंबेडकर वाचायलाच हवेत’
वर्तमानात राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांच्या कार्यावर आधारित साहित्य नव्या पिढीला वाचून दाखवलेच पाहिजे. त्याच्याही पुढे जावून गांधी आणि सावरकरही वाचून दाखवले पाहिजेत, ही आजची खरी राजकीय गरज असल्याचेही किशोर कदम यांनी आवर्जुन सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com