महापूराची शक्यता नाही

महापूराची शक्यता नाही

Published on

यंदा महापुराचा धोका नाही
विजयकुमार दिवाण; धरणांतील पाणीसाठा नगण्य

कोल्हापूर, ता. ८ ः ‘‘महापूर येऊ नये यासाठी उपाययोजना, केंद्रीय जल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी उभारलेला जनरेटा, दै. ‘सकाळ’मधून केलेली जागृती यामुळे यंदा पाटबंधारे विभागाने धरणातील पाणीसाठा नगण्य केला. येथून पुढे कितीही पाऊस पडला तरी यंदा पावसाळी हंगामात महापुराचा धोका उद्‌भवणार नाही,’’ असे स्पष्ट मत धरणसाठा जल अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी आज दै. ‘सकाळ‘शी बोलताना व्यक्त केले.
२०१९ व २०२१ यावर्षी कोल्हापूर, सांगलीला महापुराचा विळखा बसला. जनजीवन विस्कळीत झाले. सांगलीत वीस दिवस तर कोल्हापूरसह उपनगरीय भागात पंधरा दिवस पाणी साठून राहिले. यंदा पावसाने जोर धरण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाण यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘धरणात पाणीसाठा अतिरिक्त असताना पाऊस जास्त प्रमाणात झाला. कोयना धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडले की, पहिल्यांदा पूर येतो. त्यानंतरही पावसाचा जोर व विसर्ग सुरूच राहिला तर महापूर येतो. यंदा तशी स्थिती नसेल. कारण कोयना धरणात अवघा १९ टीएमसी तर राधानगरी धरणात दोन टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे कोयनेतून ५५ ते ६० हजार क्युसेक किंवा राधानगरी धरणातून दहा हजार क्युसेक्स पाणी जास्त काळ सोडण्याची वेळ तूर्त येणार नाही. मागील अनुभव पाहता पंधरा जुलैनंतर वीस आगॅस्टपर्यंतच्या काळात जोरदार पाऊस झाला तेव्हा धरणात पाणी जादा होते. यंदा पाटबंधारे विभागाने पावसापूर्वीच धरणे रिकामी करून ठेवली आहेत. पाऊस कितीही झाला, धरणे भरून वाहू लागली तरी नदीतून पाणी पुढे जाईल. कारण अलमट्टी धरणातील पाणीसाठा यंदा कमी आहे. त्यामुळे राजापूर बंधाऱ्यातून पाणी पुढे निघून जाईल. त्यामुळे धरणातून अगदीच जास्त पाणी सोडले किंवा पाऊस वाढला तरी नदीतून वाहणारे पाणी काही ठिकाणी पात्राबाहेर पडेल. मात्र महापूर येणार नाही, असे तूर्त स्थितीवरून दिसते.’
कोयना धरणातील विसर्ग व अलमट्टी धरणाच्या पाण्याची फुग यातून कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांचे पाणी आडून राहून महापूर आल्याचे दोन्ही वेळा दिसले. यंदा कोयना व अलमट्टी धरणातील पाणी साठाच नगण्य असल्याने तो भरेपर्यंत ऑगस्टअखेर उजाडेल. तोपर्यंत पावसाचा जोर कमी झालेला असेल. त्यामुळे महापुराची चिंता नसल्याचे मत श्री. दिवाण यांनी व्यक्त केले.

चौकट
धरणातील सध्याचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
कोयना धरण १९.१५ टीएमसी (क्षमता १२० टीएमसी)
वारणा धरण १२ (१७ )
अलमट्टी धरण १९.१४ (१४०)
राधानगरी धरण २.८७ (७)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.