आंबिल यात्रा

आंबिल यात्रा

56294, 56297,56290
.............
‘उदं गं आई उदं’ च्या गजरात आंबिल यात्रा
लाखांवर भाविकांची उपस्थितीः पहाटेपासून नैवेद्य अर्पण करण्यासाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः ‘उदं गं आई उदं’ च्या अखंड गजरात आज ओढ्यावरील रेणुका मंदिरात पारंपरिक उत्साहात आंबिल यात्रा झाली. पहाटेपासूनच नैवेद्य अर्पण करण्यासह दर्शनासाठी लाखांवर भाविकांनी गर्दी केली. मोठ्या गर्दीमुळे मंदिर परिसराला जोडणाऱ्या सर्वच मार्गावर जत्रेचेच स्वरुप आले. वाहतूक पोलिस आणि स्वयंसेवकांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. नैवेद्याची नासाडी होवू नये, यासाठी शंभरहून अधिक स्वयंसेवक कार्यरत होते.
सौंदत्ती यात्रेसाठी गेलेले मानाचे जग काल रात्री मंदिर परिसरात परतले आणि विसावले. पहाटे चारच्या सुमारास देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. त्याचवेळी मंदिर परिसरात भाविकांची गर्दीही वाढू लागली. महिला व पुरुष अशा दोन स्वतंत्र रांगातून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. एकीकडे गर्दी वाढत असतानाच पालखी सजावट आणि मानाच्या तिन्ही जगांची पूजा बांधण्यात आली. दुपारी अडीचच्या सुमारास आरती आणि मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा झाली. रात्री नऊच्या सुमारास मानाचे जग आणि पालखीच्या मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा झाल्या. त्यानंतर मानाच्या जगांचे आपापल्या ठिकाणी प्रस्थान झाले. मदनआई शांताबाई जाधव, यात्रा समितीचे विजय पाटील, उमेश यादव, नीलेश चव्हाण, प्रथमेश जाधव, अमित कांबळे, वरुण गोडेकर, सचिन जाधव, अनिल क्षीरसागर, राजू माने आदींनी संयोजन केले.
...
सहकुटुंब सहभोजन...
अनेक कोल्हापूरकरांनी यात्रेच्या निमित्ताने सहकुटुंब हजेरी लावली. देवीला अर्पण केलेला नैवेद्य पुन्हा भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. या प्रसादाबरोबरच मंदिर परिसरात सहकुटुंब सहभोजनावरही भर दिला गेला. त्यानंतर सर्वांचाच मोर्चा यात्रेकडे वळला. तेथे विविध करमणुकीच्या साधनांबरोबरच विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही मोठी गर्दी झाली.
...
अशीही परंपरा...
सौंदत्तीहून वैधव्य पत्करुन परतल्यानंतर रेणुका देवीच्या सांत्वनासाठी यात्रा भरते. अजूनही कोल्हापुरात सांत्वनासाठी गेल्यानंतर किमान काही अन्न बरोबर घेवून जाण्याची परंपरा आहे. दुःखातील माणसाला भरवणे आणि स्वतःही दोन घास खावून परतताना तोंड गोड केले जाते. भाविकांच्या आग्रहाखातर देवी दुःख बाजूला सारुन पुन्हा नवा साज घेते आणि मग सारे मिळून आनंदोत्सव साजरा केला जातो. हीच माणुसकीची परंपरा आंबिल यात्रेच्या निमित्तानेही जपली गेली आहे.
...
लाखोंची उलाढाल...
आंबिल यात्रेच्या निमित्ताने फेरीवाल्यांसह विविध खाद्यपदार्थ, खेळण्यांसह इतर साहित्यांचे स्टॉलही सजतात. त्याशिवाय करमणुकीच्या साधनांनीही हजेरी लावली होती. नववर्षांच्या सुरवातीलाच या सर्व विक्रेते आणि व्यावसायिकांची मिळून लाखोंची उलाढाल झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com