प्रश्न नियोजकाच्या चुकीचा अकरा हजार विद्यार्थ्यांना फटका

प्रश्न नियोजकाच्या चुकीचा अकरा हजार विद्यार्थ्यांना फटका

‘ॲडव्हान्स अकौंटन्सी’चा बुधवारी पुन्हा पेपर;
प्रश्न नियोजकाच्या चुकीचा ११ हजार विद्यार्थ्यांना फटका

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः प्रश्न नियोजक (पेपर सेटर), विषय अध्यक्षांची चूक आणि दुर्लक्षाचा कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ‘ॲडव्हान्स अकौंटन्सी’ या विषयाचा पेपर दिलेल्या अकरा हजार विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. या पेपरमधील सोळा गुणांच्या प्रश्नाबाबत संदिग्धता दूर झाली नसल्याने शिवाजी विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची संबंधित विषयाची परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाने मार्च-एप्रिल उन्हाळी सत्रासाठी जाहीर केलेल्या परीक्षा वेळापत्रकानुसार बी. कॉम. भाग तीन सत्र सहाच्या ‘ॲडव्हान्स अकौंटन्सी पेपर-थ्री’ सोमवारी (ता. १) सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये झाला. मात्र, त्यातील एका सोळा गुणांच्या प्रश्नाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संदिग्धता निर्माण झाली. त्याची खातरजमा परीक्षा मंडळाने केली. संबंधित विषयाच्या प्रश्न नियोजक, विषय अध्यक्षांकडून संपर्क साधून संदिग्धता दूर करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यादिवशी नियोजनानुसार पेपर घेतला. मात्र, गुणवत्तेवर प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परीक्षा मंडळातर्फे या विषयाची पुनर्परीक्षा बुधवारी (ता. १०) सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत घेतली जाणार आहे. त्याबाबत बी. कॉम. अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना परीक्षा मंडळाने आज सूचना केली आहे. प्रश्नपत्रिका नियोजकांच्या चुकीचा नाहक त्रास होत असून, त्याबाबत विद्यार्थ्यांमधून विद्यापीठाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
......
आम्हाला नाहक त्रास का?
प्रश्न चुकला अथवा त्याबाबत संदिग्धता आहे म्हणून पूर्ण परीक्षाच नव्याने घेण्याचा निर्णय प्रचंड त्रासदायक असल्याची भावना संबंधित विषयाच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आमच्यापैकी काही विद्यार्थी बहिस्थ आहेत. नोकरी करत ते शिक्षण घेतात. विद्यापीठ पातळीवरील चूक असताना आम्हाला नाहक त्रास का? पुनर्परीक्षा घेतल्याने आर्थिकदृष्ट्या फटका बसणार आहे. या परीक्षेला अजून सहा दिवस बाकी आहेत. त्या दरम्यान विद्यापीठाने ज्या प्रश्नाची चूक झाली. त्याबाबत गुण देऊन आमचा त्रास टाळावा, अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
.......
विद्यापीठ कारवाई करणार
एकूण चाळीस गुणांच्या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी बारा गुणांची आवश्यकता असते. मात्र, या पेपरमधील सोळा गुणांच्या प्रश्नाबाबत संदिग्धता होती. तितके गुण सरसकट विद्यार्थ्यांना दिल्यास ते गुणवत्तेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. त्यामुळे पुनर्परीक्षेचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा देऊन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला सहकार्य करावे. या प्रश्नाच्या संदिग्धतता, चुकीबाबतचे प्रकरण विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीसमोर ठेवण्यात येईल. समिती याबाबत प्रश्न नियोजक, विषय अध्यक्षांची चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई करेल, असे परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com