गडहिंग्लजच्या पूर्वभागात टंचाईची भीती

गडहिंग्लजच्या पूर्वभागात टंचाईची भीती

gad43.jpg
75333
येणेचवंडी ः लघु पाटबंधारे तलावातील पाणीसाठा कमी होत असून प्रचंड उन्हामुळे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे.
------------------------------------------------
गडहिंग्लजच्या पूर्वभागात टंचाईची भीती
जलसाठे आटताहेत ः तलावांनी तळ गाठला, पिकेही आली धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ ः तालुक्याच्या हलकर्णी पूर्व भागातील दोन तलावांनी तळ गाठला आहे. नरेवाडी तलावात अद्यापी ५० टक्क्यांवर पाणी साठा आहे. तेरणी व येणेचवंडी तलावावर अवलंबून पाणी योजना अडचणीत येण्याचा धोका असून संबंधित गावे तहानण्याची भीती आहे. पाण्याअभावी आणि कडक उन्हामुळे पीकेही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पूर्वभागात वीसहून अधिक खेड्यांचा समावेश आहे. काही गावात पाण्याचे पारंपरिक स्त्रोत आटत आले आहेत. तेरणी व येणेचवंडी तलावांमध्ये तर २० टक्क्यांपर्यंत पाणी उपलब्ध आहे. यामुळे तलावावर अवलंबून असणारी पिके अडचणीत येणार आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन पाटबंधारे खात्याने सर्वत्र उपसाबंदीचा निर्णय घेत आहे. पाणी कमी असल्याने आधीच पाटबंधारेने ऊस लागवड न करण्याचे आवाहन केले होते. परंतु काही शेतकऱ्यांनी धाडसाने ऊस केल्याने त्या शेतकऱ्यांना आता पाणी...पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. अजूनही दोन महिने उन्हाळ्याचे असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ उडण्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत.
मुळात पावसाळा आणि अवकाळी पावसाने या भागाकडे पाठ फिरवली आहे. अगदी नगण्य पाऊस या परिसरात झाला आहे. यामुळे भागातील पाण्याची पातळीही खालावली आहे. कूपनलिका, विहिरींचे पाणीही आटत आहे. तेरणी, बुगडीकट्टी, कळविकट्टी, येणेचवंडी आदी गावांत उर्वरित उन्हाळ्यात पाणी जपून वापरण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांनी पाण्याची बचत करून संभाव्य पाणीटंचाईचे संकट वाचवण्याची आवश्यकता आहे. पाण्याचा अनावश्यक वापर टाळले तरच हे संकट दूर होणार आहे. दरम्यान, खणदाळ, नांगनूर, इदरगुच्ची, कडलगे आदी भागाला पिण्यासाठी हिरण्यकेशीतील पाण्याने तारले आहे. परंतु शेतीला या भागात पाणी अपुरे पडत आहे. चित्रीच्या आवर्तनातून मिळणारे पाणी आठ दिवसापेक्षा जास्त कालावधी राहत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीला उपसा सुरू असून नदीपात्र आठवड्यातच कोरडे पडत आहे. एकंदरीत तालुक्याचा हलकर्णी पूर्वभागात तहान वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
---------------
कर्नाटकच्या उपशावर निर्बंध हवे
मुळात निलजी बंधाऱ्यापर्यंतच चित्रीचे लाभक्षेत्र आहे. माणुसकीच्या भावनेतून त्याखालील गावांना पाटबंधारे पाणी देत आहे. परंतु, त्या पाण्याचा लाभ कर्नाटकातील शेतकरीही घेत आहेत. केवळ पिण्यासाठीच नव्हे तर शेतीसाठी एक ते पाच किलोमीटरपर्यंत जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्यावर पाटबंधारे खाते गांधारीच्या भूमिकेत असून आता तरी कर्नाटकच्या बेकायदा उपशावर निर्बंध आणण्याची गरज महाराष्ट्राच्या नागरिकांतून व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com