शाह अंक

शाह अंक

80649
...
सरकारच्या धोरणांमुळे जगाच्या पोशिंद्याची उपासमार
संभाजीराजे छत्रपती : धामोड येथील सभेत टीका

धामोड, ता. २९ : ‘शेतकऱ्यांना भाजप सरकारने वाऱ्यावर सोडल्याने राज्यात शेती व्यवसाय डबघाईला आला असून, जगाच्या पोशिंद्याची उपासमार होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे सत्र सुरूच आहे. महागाईचा आगडोंब सर्वसामान्यांना होरपळून काढत आहे. मात्र, भाजप सरकार डोळ्यावर कातडं ओढून बसले आहे. केवळ उद्योगपतींकडेच हे उघडे डोळे करून पाहत आहेत’, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. अशा या निर्दयी सरकारला सत्तेवरून खाली खेचूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
धामोड (ता. राधानगरी) येथे इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच अशोक साळोखे होते.
संभाजीराजे म्हणाले, ‘ही निवडणूक म्हणजे लोकशाही विरुद्ध एकाधिकारशाही अशी लढाई सुरू आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी देशाचे संविधानच धोक्यात आणल्यासारखी सध्याची स्थिती आहे. म्हणूनच लोकशाहीच्या आणि संविधानाच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी शाहू छत्रपतींचे हात बळकट करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’ची सर्वांना स्वप्ने दाखविली. अनेक मोठमोठी आश्‍वासने दिली. मात्र, सत्तेवर येताच या आश्‍वासनांना ते विसरून गेले आहेत. महागाईने सामान्य लोकांना संकटात ढकलेले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे संपूर्ण डोळेझाक केली आहे. लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल करणारी ही सत्ता केवळ आपण मतपेटीतूनच बदलू शकतो. त्यासाठी आता जनतेने सज्ज व्हावे.’
ए. वाय. पाटील म्हणाले, ‘गेल्या ३५ वर्षांत शाहू छत्रपतींनी सामाजिक काम करताना, अडचणीत असलेल्या घटकांना मदत करताना कधीही सत्तेचा विचार केला नाही. आता त्यांच्या समाजकारणाला ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून देऊन संसदेत पाठवले पाहिजे.’
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, विश्‍वास नलवडे यांची भाषणे झाली. दगडू चौगले यांनी प्रास्ताविक केले.
याप्रसंगी ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, संचालक मानसिंग पाटील, ‘गोकुळ’ चे संचालक आर. के. मोरे, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, ‘राजाराम’चे माजी संचालक एल. एस. पाटील, विलास हळदे, प्रविण पाटील, आदी उपस्थित होते. माजी सभापती जयसिंगराव खामकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com