शेतीचे पाणी

शेतीचे पाणी

वेळापत्रकानुसार व्हावा पाणी, वीजपुरवठा
अनियमिततेने पिकांना फटका; उष्णतेच्या लाटेमुळे शेती अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० : जिल्ह्यातचे तापमान ४१ हून अधिक डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. यातच शेतीच्या पाणीपुरवठ्याला वेळापत्रकाचे बंधन आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पंधरा दिवसांतून द्यावे लागणारे पाणी ८ ते १० दिवसांनी द्यावे लागत आहे. माळरानातील पिकांना उन्‍हच नव्हे, तर उन्हाच्या झळाही सोसवेना झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात यंदा उष्णतेची तीव्र लाट आहे. पशु, पक्षी, वनस्पतींनाही उष्णतेची लाट सहन करण्यापलीकडची परिस्‍थिती निर्माण झाली आहे. याच लाटेमुळे शेती अडचणीत येत आहे. शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक महिन्याचे नियोजन केले आहे. यामध्ये शेतीला चार दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत, तर तीन दिवस रात्री १ ते सकाळी ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा केला जातो. या वेळेत वीजपुरवठा खंडित झाला तर जेवढा वेळ वीज खंडित झाली, तेवढ्या वेळेची वीज वाढवून देण्याचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात पाण्याची काटकसर करावी लागत असताना, वीजपुरवठाही खंडित होत आहे. खंडित वीजपुरवठ्याची वेळ वाढवून दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी दोन्हींकडून अडचणीत येत आहे. उन्हाच्या तडाख्याने मरगळलेल्या पिकांना आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे लागते. जे शेतकरी सहकारी सेवा संस्थांकडून पाणी घेतात त्यांना पंधरा दिवसांतून एकदा पाणी मिळते. त्‍यामुळे पिकांचे हाल पाहवत नाहीत. जिल्ह्यात ऊस, ज्वारी, बाजरी, सूर्यफुलांसह इतर पिकांना तीव्र उन्हाचा फटका बसत आहे. त्‍यामुळे ज्याप्रमाणे त्यांची वाढ झाली पाहिजे तेवढी वाढ होताना दिसत नाही. नदी किंवा ओढ्यात पाणी साचलेले दिसते. त्या पाण्याला वेळपत्रकाचे बंधन आहे. वेळापत्रकानुसार पाणी द्यावे तर वीजपुरवठा खंडित होत आहे. अशा दुहेरी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा उन्हाळा खूपच त्रासदायक ठरला आहे.
....

पाणी आठवड्याला द्यावे लागते
पिकांना पंधरा दिवसांतून द्यावे लागणारे पाणी आठवड्याने द्यावे लागत आहे. वेळापत्रकानुसार वीजपुरवठा झाला पाहिजे. तसेच वीजपुरवठा खंडित झालेली वीज वाढवून मिळाली पाहिजे. याकडे कोणताही अधिकारी लक्ष देत नाही. याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
- विजय पाटील, शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com