शरद पवार पत्रकार परिषद

शरद पवार पत्रकार परिषद

मोदींकडून पंतप्रधानपदाची सर्वाधिक अप्रतिष्ठा
शरद पवार यांची टीका ः धर्माच्या नावाखाली आरक्षण ही संकल्पनाच अमान्य

कोल्हापूर, ता. २ ः ‘इंडिया आघाडी पाच वर्षांत पाच पंतप्रधान करणार इतके खोटे, अवास्तव बोलणारा पंतप्रधान मी पाहिला नाही. पंतप्रधानपदाची कधी झाली नव्हती इतकी सर्वाधिक अप्रतिष्ठा नरेंद्र मोदी यांच्याकडून होत आहे,’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, धर्माच्या नावावर आरक्षण ही संकल्पनाच आम्हाला मान्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे करण्याचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करू. सामाजिक तणाव वाढवण्यासाठीच त्यांच्याकडून हा अपप्रचार सुरू असल्याचेही श्री. पवार म्हणाले.
कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर गुरुवारी पंचशील हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘मतदानाची टक्केवारी कमी होण्यासाठी लोकांची उदासीनता, नाराजीबरोबरच कडक उन्हाळाही कारणीभूत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक मतदानाला बाहेर पडले नाहीत. पाच वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. शेतकरी नाराज आहेत. तरुणांमधील उत्साह कमी आहे. त्याचीच चिंता राज्यकर्त्यांना भेडसावत असल्याने तमिळनाडू, मध्य प्रदेश अशा राज्यांत एकच टप्पा असताना महाराष्ट्रात पाच टप्पे केले. जास्तीत जास्त मतदारसंघांत पंतप्रधान जावेत याची काळजी घेतली आहे.’
सत्ताधाऱ्यांकडून सत्तेच्या गैरवापराबाबत श्री. पवार म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी अजून सांगितलेली नाही. दोन दिवसांनी केवळ टक्केवारी जाहीर केली. त्यातही वाढ झाली. हा प्रकार काळजी करण्यासारखा आहे. त्याची माहिती घ्यावी लागणार आहे. नागपूर, चंद्रपूरपेक्षा गडचिरोलीला जादा मतदान झाले आहे, हे शंकास्पद आहे. सध्या मोदी आघाडी पुढे असल्याचे पंतप्रधान धडधडीत खोटे सांगतात. इंडिया आघाडी पाच वर्षांत पाच पंतप्रधान करणार हा जावईशोध कुणी लावला? मोदींना हे दिवास्वप्न पडत आहे. त्यांच्याच डोक्यातून ते निघाले असून, ते आमच्या डोक्यात नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीत त्याची चर्चाही झालेली नाही. बहुमत मिळाल्यानंतर पाच वर्षे एक पंतप्रधान व स्थिर सरकार दिले जाईल. निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाबाबत निर्णय घेतला जाईल.’
शरद पवार म्हणाले, ‘स्थानिक नेत्यांनी लिहून दिलेल्या तीन-चार वाक्यांनी भाषणाची सुरुवात करायची ही त्यांची स्टाईल आहे. लोकांचे समाधान करण्याचे विषय नसल्याने मूळ विषयांना बगल देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. त्यातूनच भटकंती आत्मासारखे वक्तव्य करून पंतप्रधानपदाची ते अप्रतिष्ठा करत आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो. त्याला जात, धर्म, प्रांत याचा विचार करून चालत नाही. दक्षिणेकडील राज्यात प्रतिसाद मिळाला नाही. विरोध होत आहे. त्यामुळे दक्षिण भारत हा वेगळा देश करण्याबाबतची चर्चा ते घडवून आणत आहेत. लोक हे मान्य करणार नाहीत. झारखंड, पश्‍चिम बंगाल, हरियाणा, दिल्लीतील मंत्र्यांबाबत जी स्थिती आहे तीच सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत होत आहे. त्रास देणे, खोट्या केस दाखल करणे हे काम सुरू असून, सत्तेच्या गैरवापराचे हे उत्तम उदाहरण आहे. राज्यकर्ते कोणत्या टोकाला जात आहेत हे दिसते. धनंजय मुंडे करत असलेल्या वक्तव्यातून त्यांचे चारित्र्य स्पष्ट होत आहे.’
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, ए. वाय. पाटील, रामराजे कुपेकर, जाहिदा मुजावर, पद्मा तिवले, अनिल घाटगे आदी उपस्थित होते.
...............
चौकट
२०१९ ची स्थिती नाही
२०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला केवळ ६, तर भाजप-सेना युतीला ४२ जागा मिळाल्या; पण यावेळी तशी परिस्थिती राज्यात दिसत नाही. कारण शेतकरी सरकारच्या योजनांबद्दल नाराज आहेत आणि गेल्या दोन निवडणुकांत मोदी मोदी म्हणणाऱ्या तरुणांतील उत्साह कमी झाला आहे.
.....
चौकट
ंचर्चेशिवाय सांगलीचा निर्णय
जागा वाटपाबाबत पवार म्हणाले, ‘आघाडीचे जागा वाटप करताना ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे त्यांना उमेदवारीची संधी द्यायची असे ठरले. इतक्याच जागा पाहिजेत असा हट्ट केला नाही. कोल्हापूरच्या जागेसाठी जनता मागे असल्याने शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न केला; पण सांगलीची एकमेव जागा आहे की, त्याची चर्चा झाली नाही. थेट टीव्हीवर पाहिल्यानंतर समजले. सांगलीबाबत म्हणून समजून घेतले.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com