सभा मुख्य बातमी - शरद पवार, उद्धव ठाकरे

सभा मुख्य बातमी - शरद पवार, उद्धव ठाकरे

80962....
कोल्हापूर ः येथील गांधी मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत बोलताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार. (बी. डी. चेचर ः सकाळ छायाचित्रसेवा)

महाराष्ट्र लुटणाऱ्यांना गाडून टाका ः ठाकरे
महाराष्ट्राचा हिसका तुम्हाला सहन होणार नाही ः शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः ‘‘महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देऊन हुकूमशाहांचे सरकार गाडून टाका. गुजरातमधील दोन माणसे महाराष्ट्र लुटत आहेत. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. तो या दोघांच्या हाती द्यायचा नाही. त्यांचा निवडणुकीत सुफडासाफ करा,’’ असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी येथे केले. यावेळी ‘‘महाराष्ट्राचा हिसका तुम्हाला सहन होणार नाही,’’ असा इशारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विरोधकांना दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी येथील गांधी मैदानात आयोजित ‘शिव-शाहू निर्धार’ सभेत ते बोलत होते.
श्री. ठाकरे यांनी व्यासपीठावर येताच, ‘‘हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले, आंबेडकरांचा आहे की शहा, मोदी, अदानींचा आहे? महाराष्ट्र शहा-मोदी-अदानींच्या हातात देणार आहात का?,’’ असा सवाल करून बोलण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र दिन म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या इतिहास सांगणारा दिवस आहे. मुंबईतील हुतात्मा स्मारकाला वंदन केले आणि तेथील शेतकरी व कामगारांच्या मूर्तीच्या हातातील मशाल घेऊन आपण पुढे निघालो आहोत. हुतात्म्यांना वंदन करताना मी शपथ घेतली, की रक्त सांडून मिळविलेली मुंबई आम्ही महाराष्ट्र द्रोह्यांच्या हातात जाऊ देणार नाही. जे महाराष्ट्र लुटताहेत, ओरबडताहेत त्यांचा सुफडासाप केल्याशिवाय राहणार नाही, ही शपथ तुम्ही घेणार की नाही?’’

‘गजनी’ सरकार झाले आहे...
श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘विरोधकांना असे वाटते की शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संपले की महाराष्ट्र आपल्या ताब्यात येईल. मोदीजी तुम्ही पंतप्रधानपदाला साजेसे असे बोला. सध्या मोदी सरकारचे ‘गजनी’ सरकार झाले आहे. त्यांना २०१४ ला काय बोलले ते २०१९ ला आठवत नाही. २०१९ ला काय बोलले ते २०२४ ला आठवत नाही. २०२४ नंतर ते आता सत्ता बघणारच नाहीत.’’

मोदींचाच आत्मा वखवखलेला
श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली; मात्र मोदींचाच आत्मा वखवखलेला आहे. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातच्या भूकंपात आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष शरद पवार यांना केले होते. हे त्यांचे मोठेपण होते. पक्षाच्या, राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन पवार गुजरातच्या मदतीला धावून गेले होते. याला दिलदारपणा लागतो. तो शरद पवारांकडे आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे होता. भटकता आत्मा असतो, तसा एक वखवखलेलाही आत्मा आहे. हा एवढा वखवखला आहे, की तो स्वतःची तुलना शिवाजी महाराजांच्या सोबत करीत आहेत.’’

गद्दारांना उमेदवारी हेच तुमचे अपयश
उमेदवारीवरून टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘‘तुम्हाला तुमचे उमेदवार मिळत नाहीत म्हणून तुम्ही आमचे चोरता आणि त्यांना उमेदवारी देता, हेच तुमचं अपयश आहे. तुम्ही चाळीस चोरले असतील; पण आज महाराष्ट्रातील लाखो नव्हे करोडो लोक माझ्यासोबत, पवारांसोबत आणि महाविकास आघाडीसोबत आहेत.’’

पालकमंत्र्यांवरही टीका
श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘आज मुश्रीफबाबा कोठे गेले? मला आजही आठवतेय, त्यांच्या पत्नी तळमळीने सांगत होत्या, की चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागून बदनाम करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला. आता आरोप करणाऱ्यांना काय लिमलेटीची गोळी दिली काय?’’

सत्तेवर येताच त्यांना तडीपार करू
श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्या मशाल गीतामधील तो एक शब्द काढायला सांगताय. वाट्टेल ते झाले तरीही तो काढणार नाही. मोदीजी ‘जय भवानी, जय शिवाजी’ हा आमचा आत्मा आहे. तुम्ही तोच मारायला निघाला आहात. शेतकऱ्यांनी तुमचे घोडे काय मारले आहे? मोदी सरकार शेतकऱ्याला सहा हजार भीक म्हणून देतो. बळी राजाला काय भिकारी समजता काय? इंडिया सरकार सत्तेवर येणारच. सरकार आल्यावर या महाराष्ट्राचे वैभव लुटणाऱ्यांना आम्ही तडीपार करणारच.’’

यावेळी काय ठरलंय सतेज!
सतेज पाटील यांच्याकडे पाहून ठाकरे म्हणाले, ‘‘गेल्यावेळी तुमचं ठरल होतं. यावेळी काय ठरलंय? भाजप प्रवृत्ती किती खालच्या पातळीची आहे, हे येथील माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी जाहीर सांगितले आहे. विधानसभेत ताकद कमी करायची म्हणून शिवसेनेचे उमेदवार पाडले. माझ्या शिवसेनेशी, भगव्याशी गद्दारी केली, त्यांचा सूड घ्यायला मी कोल्हापुरात आलो आहे.’’

टीकेसाठी उद्धव आणि मीच दिसतो
खासदार शरद पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वाद सुरू होता. मराठी माणूस मराठी राज्य निर्माण करण्यासाठीचा आग्रह करीत होता. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. आजच्या पिढीला या चळवळीचा इतिहास फारसा माहिती नाही. गावागावांतील घराघरांतील हजारोंच्या संख्येने तरुण लढा देत होते. मराठी भूमीचं हे राज्य झाले पाहिजे, यासाठी तरुणाईचा लढा होता. त्यात कोल्हापूर जिल्हा जिल्हा अग्रेसर होता. येथील माधवराव बागल, कारखानीस, पी. व्ही. साळुंखे अशा अनेकांनी यशवंतराव चव्हाण यांच्या मागे शक्ती उभी केली. त्यातून १ मे रोजी १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली.’’
ते म्हणाले, ‘‘कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊऩ गेले. हल्ली महाराष्ट्रात जाण्याशिवाय त्यांना काही दिसत नाही. चांगली गोष्ट आहे. या आम्ही तुमचे स्वागत करतो. देशाचे पंतप्रधान एखाद्या राज्यात जात असतील, तर तेथील जनतेला संबोधित करत असत. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासारखे पंतप्रधान हे देशातील गरिबी कशी घालवणार याबाबतची भूमिका मांडत होते; मात्र आजचे पंतप्रधान महाराष्ट्रात येतात आणि त्यांना येथे दोन लोकांची आठवण प्रकर्षाने होते. त्यात एक उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार. त्यांच्यावर टीका केल्याशिवाय त्यांना स्वस्थ बसवत नाही. मला त्यांना एवढेच सांगायचे आहे. मोदी साहेब तुम्ही महाराष्ट्रात कितीही वेळा या. पण, महाराष्ट्रासह देशाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला हिसका दाखविल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही आणि तो तुम्हाला सहन होणार नाही.’’

राजर्षींचा विचार संसदेत पोहचणारच!
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेचा विचार पुढे नेण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. याचे कोल्हापूरच्या जनतेने उत्स्फूर्तपणे स्वागत केले. भाजप सरकारवर देशातील सर्वच जनतेचा प्रचंड रोष आहे. जनता महागाईने त्रस्त आहे. बेरोजगारी वाढत आहे. संसाराचा गाडा कसा चालवायचा, हा प्रश्न सामान्यांपुढे आहे. न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार आणि गोळीबार केला जात आहे. खते, शेती औजारांवरील जीएसटी रद्द झाला पाहिजे. छोटे उद्योजक कराच्या ओझ्याखाली आहेत. स्टार्टअप इंडियासारख्या योजना फसव्या आहेत. काही उद्योपतींसाठी सरकार काम करत आहे. भ्रष्टाचार केलेल्यांना मानाची पदे देऊन काय मिळाले? केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकारणांसाठी केला जात आहे. निवडणुका नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाचे अस्तित्वच धोक्यात आहे. पाच-सहा दिवस रथीमहारथी कोल्हापुरात तळ ठोकून आहेत. काहीही झाले तरी राजर्षी शाहू महाराज यांचा विचार संसदेत पोहचवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com