काळम्मावाडी गळती पाण्यातचं

काळम्मावाडी गळती पाण्यातचं

फोटो ...
...
‘काळम्मावाडी’च्या गळतीकडे दुर्लक्ष
धोकादायक गळती सुरूच : यावर्षीही निघणार नाही गळती
सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : काळम्मावाडी धरणात पूर्ण क्षमतेने पाणी भरल्यास धोका संभवतो. गळतीमुळे धरणाला धोका आहे. तत्काळ याची गळती काढली पाहिजे, असा इशारा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून वर्षभर दिला जात होता. यासाठी विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर गळती काढण्यासाठी ८० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याचे गांभीर्य लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना राहिले नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर्षी गळती काढण्याचे काम होणे अशक्य आहे.

काळम्मावाडी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील शेतीला वरदान ठरले आहे. लाखो लोकांची तहान भागवण्याचे काम हे धरण करीत आहे. मात्र, धरणाच्या गळतीचे गांभीर्य सांगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याचा पाठपुरावा करणे सोडलेले दिसून येत आहे. गळती काढली नाही तर धरणाला धोका होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी वारंवार सांगितले आहे. १५ ऑगस्ट २०२३ ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या वर्षीचा पावसाळा झाल्यानंतर गळती काढण्याचे काम तत्काळ सुरू करणार असल्याचे सांगितले होते. आता यावर्षी दुसरा पावसाळा आला तरीही कामाचा पत्ता नाही. यावर्षी हे काम सुरू होईल, याबाबत खात्री देणे अवघड आहे. धरणाला धोका आहे म्हणून लोकांना भीती घालायची आणि दुसरीकडे सोयीनुसार त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार सर्व लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांच्या अंगाशी येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. शासनाने ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्रत्यक्ष गळती काढण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया राबविण्यास विलंब केला आहे.
आता ही सर्वच यंत्रणा लोकसभा निवडणुकीचे कारण देत आहे. लोकप्रतिनिधींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून लोकसभा लढवली. याच लोकप्रतिनिधींनी गळती काढण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली तरच गळतीचे काम पूर्ण होऊन तेथील लोकांना याचा फायदा होऊ शकतो.
...
धरणाची सद्य:स्थिती ...
- १२१ गावांमधील ४१ हजार हेक्टर क्षेत्रांवरील शेतीला पाणीपुरवठा
- धरणाला दोन वर्षांत पाच पट गळती वाढली
- धरणाच्या गळतीतून एका सेकंदाला ३५० लिटर, तर एका मिनिटाला २१ हजार लिटर पाणी वाया जाते
.....

‘काळम्मावाडी धरणाची गळती काढण्याचे काम लवकरच केले जाणार आहे. आचारसंहितेमुळे काही काळ काम थांबले आहे. यावर्षी दोन थरापर्यंतचे काम पूर्ण होईल. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत.
ए. एस. पवार, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com