साखर हंगाम संपला

साखर हंगाम संपला

साखर उत्पादन पाच लाख टनांनी वाढले
राज्यातील चित्र ः उताऱ्यात यावर्षीही कोल्हापूर विभागाची आघाडी
.............
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः गेल्यावर्षीच्या साखर हंगामाच्य तुलनेत यावर्षी साखर उत्पादनात पाच लाख टनाची वाढ झाली असून, सरासरी साखर उतारा मात्र घटला आहे. राज्यातील साखर हंगामाची अधिकृत सांगता बुधवार (ता. १५) झाली. त्यानंतर साखर आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती जाहीर करण्यात आली.
दरम्यान, यावर्षीच्या हंगामात वाढलेले उसाचे उत्पादन, लांबलेला हंगाम यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीचा साखर हंगाम महिनाभर लांबला होता. आता साखर विक्री करून अंतिम टप्प्यात तुटलेल्या उसाचे बिल देण्याचे आव्हान साखर कारखान्यांसमोर आहे. राज्यात साखर उताऱ्यात यावर्षीही कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे. कोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा ११.५९ आहे.
राज्यात यावर्षी २०७ साखर कारखान्यांनी हंगाम घेतला. यापैकी १०३ सहकारी, तर १०४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. गेल्या हंगामात २११ कारखान्यांनी हंगाम घेतला होता, त्यात १०६ सहकारी व १०४ खासगी कारखान्यांचा समावेश होता.
राज्यातील साखर हंगामाची अधिकृत सांगता १५ मे रोजी झाली असली तरी कोल्हापुरातील हंगाम ५ एप्रिल रोजीच संपला. सर्वात शेवटी कुंभी-कासारी कारखान्याचा हंगाम संपला. जिल्ह्यात १६ सहकारी व सात खासगी कारखान्यांनी मिळवून १५३ लाख २१ हजार ५६४ टन ऊस गाळप करून १८० लाख २२ हजार ३९ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १२.९९ साखर उतारा दालमिया शुगर्सने घेतला आहे.
हंगामाच्या सुरुवातीला एफआरपीपेक्षा प्रतिटन २०० रुपये जास्त मिळावेत, या मागणीसाठी शेतकरी संघटनांना आंदोलन पुकारले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुकारलेल्या या आंदोलनात संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन नियोजित वेळेत हंगाम सुरू होऊ दिला नाही. त्यामुळे तब्बल महिनाभर उशिरा हंगाम सुरू झाला. यावर्षी उसाखालील लागवडीचे क्षेत्र अधिक असल्याने हंगाम वेळेत सुरू व्हावा, अशी कारखानदारांसह उत्पादकांचीही मागणी होती. पण, हंगाम लांबल्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसला. एक-दोन वेळ झालेला अवकाळी पाऊस वगळता पावसाने पाठ फिरवल्याने अंतिम टप्प्यातील उसाला पाणी मिळाले नाही. त्याचा परिणाम साखर उताऱ्यावर झाला. महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यात हंगाम लवकर सुरू झाला. त्यातून तोडणी कर्मचारी अशा राज्यात गेल्याने त्याचाही परिणाम हंगामावर झाला.
..............
चौकट
दृष्टिक्षेपात राज्यातील साखर हंगाम
तपशील*२०२३-२४*२०२२-२३
एकूण गाळप*१०५५ लाख मे. टन*१०७३ लाख मे. टन
साखर उत्पादन*११० लाख मे. टन*१०५ लाख मे. टन
सरासरी उतारा*१०.२७ टक्के*९.९८ टक्के
हंगाम घेतलेले कारखाने*२०७*२११

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com