८९ गावांचे पाणी थेट पंचगंगेत

८९ गावांचे पाणी थेट पंचगंगेत

८९ गावांच्या सांडपाण्याची जबाबदारी कोणाची?

थेट मिसळतेय पंचगंगेत; ग्रामपंचायती उदासीन, प्रक्रिया प्रकल्प नाहीत

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः पंचगंगा आणि तिच्या उपनद्यांच्या काठी असणाऱ्या ८९ गावांचे सांडपाणी थेट नदीत मिसळते आहे. पूर्वी गावातील लोकसंख्या कमी होती. त्यामुळे सांडपाण्याच्या प्रक्रियेचा प्रश्न नव्हता. आता लोकसंख्या वाढल्याने सांडपाण्याचे प्रमाणही वाढले आहे. याशिवाय त्यामध्ये वैद्यकीय आणि औद्योगिक सांडपाण्याचाही समावेश झाला आहे. त्यामुळे आता या गावांनी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत ग्रामपंचायती उदासीन आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे.
पंचगंगेमध्ये काही दिवसांपूर्वी मासे मृत्यूमुखी पडण्याची घटना घडली. त्यानंतर पुन्हा नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ग्रामपंचायती, कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका यांना नोटीस पाठवली आहे. दोन्ही महापालिकांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे केले असून, त्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नदीकाठी असणाऱ्या ग्रामपंचायतींनी अद्याप याबाबत काहीही पावले उचललेली नाहीत. या गावांमधील लोकसंख्या वाढली आहे, तसेच दवाखाने, सर्व्हिसिंग सेंटर, हॉटेल, गृहप्रकल्प उभारले गेले आहेत. त्यामुळे तेथील सांडपाण्यातही घातक प्रदूषके असतात. जिल्हा परिषदेने या गावांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवण्यासाठी अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही.
----------------------------------------------
जिल्हा परिषदेने या ८९ गावांची यादी बनवली आहे. या गावांचा पुन्हा आढावा घेऊन नेमके किती गावांचे सांडपाणी नदीमध्ये मिसळले, याची पाहणी केली जाईल. त्यानंतर त्या गावांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रक्रिया प्रकल्प उभारायचे, याची निश्चिती केली जाईल. ग्रापंचायतींना परवडणारे आणि प्रभावी प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे केले जातील. नजीकच्या काळात या गावांमधील सांडपाणी नदीत मिसळणार नाही, अशा उपाययोजना केल्या जातील.
- एस. कार्तिकेयन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)
--------------------------------
५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येची गावे
करवीर ः रजपूतवाडी, गाडेगोंडवाडी, आरे, चाफोडी, साबळेवाडी, कांचनवाडी, आरळे, सडोली दुमाला, आंबेवाडी, देवाळे, पाडळी (बुद्रुक), घानवडे, आमशी, महे, कोथळी, बाचणी, हळदी, कांडगाव.
गगनबावडा ः मुटकेश्वर, वेतवडे, निवडे, तिसंगी
पन्हाळा ः किसरूळ, कसबा ठाणे, पुनाळ
राधानगरी ः बरगेवाडी, घुडेवाडी, कंथेवाडी, आवळी (खुर्द), आनाजे, तारळे (खुर्द), म्हासुर्ली, येळवडे, घोटवडे, आवळी (बुद्रुक), शिरगाव
शाहूवाडी ः करंजफेण
हातकणंगले ः हालोंडी, चोकाक

००००

५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे
करवीर ः वरणगे, हासुर, बीड, कुडित्रे, सडोली खालसा, कोगे, नागदेववाडी, बालिंगे, शिरोली दुमाला, परिते, चिंचवाड, पाडळी खुर्द, प्रयाग चिखली, मोरेवाडी, शिंगणापूर, वसगडे, शिये, कळंबा तर्फ ठाणे, वळिवडे, वडणगे, गांधीनगर, मुडशिंगी, पाचगाव, उचगाव.
पन्हाळा ः कळे, यवलूज, पोर्ले तर्फ ठाणे.
राधानगरी ः कौलव, धामोड, सिरसे, कसबा तारळे, पुंगाव, राधानगरी
शिरोळ ः नृसिंहवाडी, तेरवाड, शिरढोण, यड्राव, नांदणी
हातकणंगले ः तिळवणी, तळदगे, साजणी, इंगळी, टोप, रुई, चंदूर, रुकडी, पट्टणकोडोली, कोरोची, कबनूर, पुलाची शिरोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com