नदी प्रदूषण प्रश्नी महापालिका नोटीस

नदी प्रदूषण प्रश्नी महापालिका नोटीस

कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेला नोटीस
पंचगंगा प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई; पाच ग्रामपंचायतींचाही समावेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः शहरातील सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया न करणे, नाल्यांमधील प्लास्टिक कचऱ्यांची विल्हेवाट न लावणे. आणि सांडपाणी थेट नदीत मिसळणे या कारणांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेला आज कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. अशाच प्रकारची नोटीस गांधीनगर, वळिवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, उचगाव, कळंबा आणि पाचगाव या ग्रामपंचायतींनाही पाठवली आहे. प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
पंचगंगा नदीमध्ये शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात मासे मरण्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर देसाई यांनी नदी प्रदूषणप्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार केली. तसेच नदीमध्ये मिसळणाऱ्या नाल्यांची पाहणी करून त्याचा विस्तृत अहवाल बनवला. त्यानुसार आज कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. देसाई, महापालिका उपायुक्त पंडित पाटील, नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांनी महापालिका क्षेत्रातील नाल्यांची पाहणी केली. यामध्ये पुढील निष्कर्ष दिसले. कोल्हापूर महापालिका १४९.२ दशलक्ष लिटर सांडपाण्यापैकी १०६ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करते. उर्वरित ४२.५ दशलक्ष लिटर सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये मिसळते. हे सांडपाणी विविध नाल्यातून थेट नदीमध्ये जाते. जयंती नाल्यातून बावड्यातील प्रक्रिया प्रकल्पाकडे सांडपाणी पाठवले जाते. तरीही जयंती नाला ओसंडून वहात आहे. नाल्यातील पाण्यावर प्लास्टिक कचऱ्याचा थर साचला असून, वळवाच्या पावसाने प्लास्‍टिक कचरा थेट नदीमध्ये जाते. काहीवेळा कचरा काढला जातो. पण, बाजूलाच टाकल्याने तो पुन्हा नाल्यात जातो. सीपीआर, सिद्धार्थनगर आणि जयंती नाला स्माशानभूमीच्या मागे एकत्र येतात आणि थेट नदीमध्ये मिसळतात. या सांडपाण्याला मानवी मैल्याचा वास येत असून, पाणी काळपट आहे. रमणमळा येथूनही काळे पाणी नाल्यातून नदीत जाते. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ २ ते ३ किलोमीटरपर्यंत जलपर्णी वाढलेली दिसली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी केलेल्या सूचनांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.

इचलकरंजी येथील नाल्यांची पाहणी नायब तहसीलदार योगेश जमदाडे, जल अभियंता एस. एस. देशपांडे, विश्वास बागलकोटे, बंडू पाटील आणि दिलीप देसाई यांनी केली. यात अत्यंत विदारक स्थिती दिसली. इचलकरंजी प्रक्रिया प्रकल्प पूर्णक्षमतेने कार्यान्वित नाही. प्रक्रिया प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी पिवळसर रंगाचे असल्याचे जनवाडे मळा येथे दिसले. तेरवाड बंधारा येथे नदीच्या पाण्याला वास येत असून, रंग काळसर आहे. तसेच तपकरी रंगाचा फेसही आढळला आहे. याच परिसरात नदीमध्ये २ ते ३ किलोमीटर लांब जलपर्णी साचली आहे. इचलकरंजी महापालिका क्षेत्रातील सुमारे १८ दशलक्ष सांडपाणी दररोज नदीमध्ये मिसळते. यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

चौकट
गावांमधील नाल्यातील पाणी काळसर
कोल्हापूर शहराच्या भोवती असणाऱ्या गांधीनगर, वळिवडे, गडमुडशिंगी, चिंचवाड, उचगाव, कळंबा आणि पाचगाव या ग्रामपंचायतींनाही कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. कारण या गावातील सांडपाणी प्रक्रिया न करता ओढ्यात, नाल्यात सोडले जाते. हे ओढे पंचगंगा नदीत मिसळतात. या गावांमधील नाल्यातील पाणी काळसर असून त्याला दुर्गंधी येत आहे. तसेच नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचराही आढळून आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com