बारावीत ‘कोल्हापूर’चा टक्का वाढला

बारावीत ‘कोल्हापूर’चा टक्का वाढला
Published on

85052
कोल्हापूर : बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. मोबाईलवर निकाल पाहून आनंद व्यक्त करणाऱ्या विद्यार्थिनी. ( मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

बारावीत वाढला कोल्हापूरचा टक्का
राज्यातील क्रमवारीत घसरण; मुलींची आघाडी यंदाही कायम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१: महाविद्यालयीन जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. त्यात कोल्हापूर विभागाचा निकाल ९४.२४ टक्के लागला आहे. त्यामध्ये यंदा ०.९६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टक्का वाढला असला, तरी गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेला विभाग यावर्षी चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. कोल्हापूर विभागात ९५.६६ टक्क्यांनी कोल्हापूर जिल्हा अव्वलस्थानी आहे. नेहमीप्रमाणे उत्तीर्णांमध्ये मुलींची आघाडी कायम आहे.
कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहसचिव डी. एस. पोवार, सहायक सचिव एस. बी. चव्हाण, प्रभारी शिक्षण उपसंचालक स्मिता गौड, सांगलीचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. एम. लोंढे, एन. डी. पाटील, डी. पी. पोवार, एस. वाय. दुधगावकर, तेजस गंबरे, आदी उपस्थित होते.
यावर्षी कोल्हापूर विभागात ९३.६३ टक्क्यांसह सातारा जिल्हा द्वितीय, तर ९२.८६ टक्क्यांनी सांगली तिसरा आहे. विभागातून ८६१ कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण एक लाख १४ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक लाख सात हजार ७४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ती टक्केवारी ९४.२४ टक्के आहे. ५५ हजार ५६६ मुले, तर ५२ हजार १७५ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ५.२३ टक्के अधिक आहे.

निकाल
जिल्हा* नोंदणी केलेले विद्यार्थी* परीक्षा दिलेले विद्यार्थी* उत्तीर्ण विद्यार्थी* उत्तीर्णतेची टक्केवारी
कोल्हापूर*४९४९३*४९२१०*४७०७६*९५.६६
सातारा*३४०४३*३३७८९*३१६३७*९३.६३
सांगली*३१५४१*३१३२०*२९०२८*९२.६८
...
२५२ महाविद्यालये ‘शंभर नंबरी’
कोल्हापूर विभागातील २५२ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के आहे. त्यात सर्वाधिक १०१ महाविद्यालये कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सातारा जिल्ह्यातील ८२, तर सांगली जिल्ह्यामधील ६९ महाविद्यालये आहेत.
-------
यावर्षी निकालात कोल्हापूर विभागाचा टक्का वाढला आहे; पण राज्यातील क्रम घसरला आहे. तो अगदी स्पर्धात्मक स्वरूपातील आहे. पुढील वर्षी क्रम आणि प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.
- सुभाष चौगुले, विभागीय सचिव
...
शाखानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
विज्ञान -६१८४५
कला -२२४७३
वाणिज्य- १९१२७
व्यावसायिक- ३४७२
आय. टी. आय - ८२४
...
पुर्नपरीक्षार्थी
कोल्हापूर- ५४३
सांगली- ४२७
सातारा- ३८४
...
कॉपी करणाऱ्या ११ विद्यार्थ्यांना शिक्षा
विभागातील १७५ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरमार्गाचा (कॉपी) अवलंब करताना ११ विद्यार्थी सापडले. त्यांनी केलेल्या गैरमार्गाच्या विषयाची संपादणूक रद्द करण्याची शिक्षा शिक्षण मंडळाकडे केली आहे.
...
कोल्हापूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक कायम
गेल्यावर्षी (मार्च २०२३) कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.२८ टक्के इतका होता. त्यात कोल्हापूर जिल्ह्याने ९३.८९ टक्क्यांसह पहिला क्रमांक मिळविला होता. सातारा जिल्हा ९२.८७ टक्क्यांनी दुसरा, तर सांगली जिल्हा ९२.८१ टक्क्यांनी तिसऱ्या क्रमांकावर होता. यंदाही कोल्हापूर जिल्हा विभागात अव्वल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com