कोंथबिर, पालेभाज्यांचे भाव कडाडले

कोंथबिर, पालेभाज्यांचे भाव कडाडले

gad214.jpg
87338
गडहिंग्लज : फळबाजारात तोतापुरी आंब्याची आवक वाढली आहे. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------

कोंथबिर, पालेभाज्यांचे भाव कडाडले
भेंडी, कारली, गवार तेजीत; तोतापुरी, अननसाची आवक वाढली
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : गेल्या दोन महिन्यांपासून वाढत्या उन्हाळ्यामुळे कोंथबिर आणि पालेभाज्यांची आवक कमी होती. खरीप हंगामासाठी शेती तयार केल्यामुळे ही आवकही जेमतेम झाल्याने भाव कडाडले आहेत. कोंथबिरीला १०० पेंढ्यांना ५५०० रुपये दर मिळाला. किरकोळ बाजारात आकारानुसार ४० ते ६० रुपये पेंढी अशी विक्री सुरू होती. भाजी मंडईत भेंडी, कारली, गवारचे दर तेजीत आहेत. फळबाजारात कर्नाटकातून तोतापुरी, अननसाची आवक वाढली आहे. जनावरांच्या बाजारात आवक ४० टक्क्यांवरच कायम आहे.
यंदा चांगल्या झालेल्या वळवामुळे खरीप हंगामाची तयारी गतीने झाली. साहजिकच खरीप हंगामासाठी पालेभाज्या, फळभाज्यांचे संपत आलेले क्षेत्र काढून तेथे पेरणीसाठी शेत सज्ज केले आहे. परिणामी, मंडईत आवक जेमतेमच सुरू आहे. मुळातच उन्हाळ्यात कमी पाण्यामुळे कोंथबिर, पालेभाज्यांच्या वाढीवर परिणाम झाल्याने आवक कमी असते. कोंथबिरीच्या १०० पेंढ्यांना यंदाच्या हंगामातील अधिक दर मिळाल्याचे तालुका भाजीपाला विक्री संघाचे महादेव तराळ यांनी सांगितले. मेथी, लाल भाजी दुर्मिळ झाली आहे. केवळ कोबी, ढब्बूचाच ग्राहकांना दिलासा आहे.
भेंडी, कारली, गवार यांचा किलोचा दर ८० ते १०० रुपयांवर पोहचला आहे. कांदा, बटाटा, लसूण यांचे दर स्थिर आहेत. कांदा २० ते ३५, बटाटा ३० ते ४० तर लसूण १२५ ते २५० रुपये किलो आहेत. फळबाजारात तोतापुरीची आवक वाढली असून ६० रुपये किलो असा दर आहे. कोकण हापूस कमी झाला असला तरी स्थानिक आंबे अधिक आहेत. २०० ते ३५० रुपये डझन दर आहे. अननस नगाला २० ते ३० रुपये दर आहे. संत्री, डाळिंब १२५ रुपये किलो आहेत. जनावरांच्या बाजारात उष्म्यामुळे महिनाभरापासून आवक कमी होण्यासह उलाढालही मंदावली आहे. पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झाल्यावरच आवक वाढेल, अशी माहिती विक्रेते अरविंद पाटील यांनी दिली. म्हशींची आणि शेळ्या-मेंढ्यांची सुमारे ४० टक्के आवक नोंदली. म्हैशी ५० हून अधिक असून ४० ते ८५ हजारांपर्यंत, तर शेळ्या-मेंढ्या ४० हून जास्त असून १० ते १५ हजारांपर्यंत दर होते.
--------------------
कलिंगड आवक घटली
यंदा कडक उन्हाळ्यामुळे कलिंगडाला अधिक मागणी राहिली. डिसेंबरपासूनच नवी आवक सुरू झाली होती. पहिल्या टप्प्यात सांगली आणि लगतच्या सीमाभागातून आवक होती. दोन महिने स्थानिक ग्रामीण भागातून कलिंगडाची आवक सुरू होती. स्थानिक कलिंगडाचे क्षेत्र बहुतांश संपल्याने आवक कमी झाली आहे. आज आठवडा बाजारात काही शेतकरी ट्रॅक्टरमधून शेवटच्या टप्प्यातील कलिंगड विकत होते. ३० ते ७० रुपयांपर्यंत दर होते.
------------
बाजार दृष्‍टिक्षेपात
- तांदूळ बाजारात चांगली आवक
- वरणा, काकडी गायब
- कांदा, बटाटा स्थिर
- स्थानिक आंबे अधिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com