‘जेएनयू’ बातमी

‘जेएनयू’ बातमी

लोगो : शिवराज्यभिषेक सोहळा दिन विशेष

‘जेएनयू’तील अध्यासन केंद्राला हवे
राज्यातील नूतन खासदारांचे पाठबळ

सुजितकुमार पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कर्तृत्वावर सखोल संशोधन व्हावे, यासाठी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची स्थापना करण्‍यात आली आहे. राज्य सरकराने यासाठी दहा कोटींचा निधी दिला आहे. राज्यातील नूतन खासदारांनीही यासाठी ‘अर्थबळ’ दिल्यास अध्यासनाचे क्षितिज विस्तारण्यास मदत होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणांगणातील पराक्रमाला तोड नाहीच; पण त्यापलीकडे छत्रपती शिवरायांनी विविध क्षेत्रांत घालून दिलेले आदर्श मानदंड ठरले आहेत. राजकीय मुसद्देगिरी असो वा प्रशासकीय व्यवस्थापन, सामरिक व संरक्षणात्मक दृष्टिकोनातून केलेली जलदुर्ग सिंधुदुर्गची उभारणी असो वा विविध समाज घटकांना स्वराज्य स्थापनेच्या ध्येयात सहभागी करून घेणे असो, यांसह अनेक पैलूंवर आणखी संशोधन होऊ शकते. हे विचारात घेऊन विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. शांतीश्री पंडित यांनी या अध्यासन केंद्राची स्थापना केली आहे. राज्य सरकारने त्यासाठी निधी देऊन पुढाकार घेतला आहे. ‘जेएनयू’सारख्या प्रतिष्ठित संस्थेत अध्यासन होत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचण्यास चालना मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्यातील खासदारांनी सर्वतोपरी मदत करण्याची गरज आहे.

चौकट
दृष्टिक्षेपात अध्यासन केंद्र...
* इंग्रजीसह भारतातील सर्व भाषांमध्‍ये संशोधन करण्याची संधी
* छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा शास्त्रीय आणि सैद्धांतिक पद्धतीने अभ्यास
* छत्रपती शिवाजी महाराजांवरील समग्र साहित्याचे डिजिटल संच
* राज्य कारभारासह विविध क्षेत्रांतील अतुलनीय योगदानाचा होणार अभ्यास

कोट
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन कौशल्य, स्थापत्यशास्त्र, युद्धनीती, भूराजनीती, अर्थकारण, समाजकारण, कूटनीती, सागरी धोरण, गुप्तचर यंत्रणा, सामाजिक न्याय यांवर जागतिक दर्जाचे शास्त्रोक्त संशोधन व्हावे, यासाठी ‘जेएनयू’मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची स्थापना केली आहे. ३५० व्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक दिनानिमित्त हे अध्यासन केंद्र साकारत आहे, याचा अभिमान आणि आनंद आहे. समर्थ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांवरील संशोधन हाच राजमार्ग असेल.
-प्रा. डॉ. शांतीश्री पंडित,
कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली.

कोट
कुलगुरूंच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या अध्यासनाला अत्याधुनिक बनविण्यासाठी महाराष्ट्रातील संसद सदस्यांनी सर्वतोपरी मदत करावी. पत्रकार, संशोधक, इतिहासकारांनी त्यांच्याजवळील उपलब्‍ध दुर्मीळ कागदपत्रे, संशोधन साहित्य अध्यासनासाठी उपलब्ध करून द्यावे. राज्यातील विद्यापीठांनीही सामंजस्य करार करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रानेच या अध्यासनाचे पालकत्व स्वीकारण्याची गरज आहे.
-डॉ. रोहन चौधरी,
सहायक प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com