मंत्री चंद्रकांत पाटील बातमी

मंत्री चंद्रकांत पाटील बातमी

सरकार पडणार या आशावादावरच शरद पवारांचा संघर्ष
चंद्रकांत पाटील यांची टीका ः उद्धव ठाकरेंची मेहनत; पण काँग्रेसला लाभ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः केंद्रातील सरकार पडणार या आशावादाशिवाय स्वतः आणि इतरांना संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त करता येत नाही. म्हणून शरद पवारांनी असे वक्तव्य केले असेल; पण केंद्रातील मोदी सरकार भक्कम आहे. राज्यातील शिंदे सरकार पडणार, असेही ते गेल्या दोन वर्षांपासून म्हणत आहेत; पण सरकार पडलेले नाही. त्यामुळे सरकार पडणार हा त्यांचा आशावाद आहे, अशी टीका राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच मेहनत उद्धव ठाकरे यांनी घेतली; पण फायदा काँग्रेसला झाला, असे विधानही त्यांनी केले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मंत्री पाटील म्हणाले, ‘अटलबिहारी वाजपेयी यांनी २४ पक्षांना घेऊन सरकार चालवून दाखवले. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आशादायक आहे. त्यामुळे हे सरकार स्थिर राहणार आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत खूप मेहनत घेतली. त्याचा लाभ काँग्रेसला झाला. त्यांच्या जागा वाढल्या. २०१९ च्या तुलनेत ठाकरे यांच्या जागा कमी झाल्या. तसेच विशिष्ट समाजाच्या मतांवर विजय मिळवला हा ठपका पडला. जर युती कायम ठेवली असती तर आज चित्र वेगळे असते.’
मराठा आरक्षणाबद्दल मंत्री पाटील म्हणाले, ‘मराठा समाजाच्या विकासासाठी आम्ही जे केले ते मराठा समाजापर्यंत पोहचवण्यास आम्ही कमी पडलो. जरांगे-पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांना मराठा आरक्षणातील वास्तविकता पटवून देणार आहोत. आंदोलनात १० मागण्या करायच्या असतात. त्यांतील ८ पूर्ण झाल्या की, थांबायचे असते.’ यावेळी महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे उपस्थित होते.

चौकट
उत्तर, दक्षिण मतदारसंघात सुधारणा आवश्यक
कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. तरीही ते आघाडीवर आहेत. या विधानसभा मतदारसंघात आमचे मताधिक्य वाढले असले तरी अजून काम करणे आवश्यक आहे. त्याचा विचार आम्ही करू. कागलमधील सोशल मीडियावरील मतभेद नेत्यांनी एकत्र बसून सोडवावेत.

चौकट
‘शक्तिपीठ’बाबत मार्ग मुश्रीफ यांनी काढावा
मंत्री पाटील म्हणाले, ‘कांदा निर्यात धोरणाचा फटका आम्हाला बसला. प्रत्यक्षात निवडणुकीपूर्वी निर्यातबंदी उठली होती. त्याचा लाभही शेतकऱ्यांना झाला; पण तो त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहचवण्यात आम्ही कमी पडलो. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध दिसतो. याबाबतही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकरी, आंदोलक यांची भूमिका जाणून घेऊन ती योग्य ठिकाणी मांडावी. साहजिकच त्यातून मार्ग काढावा.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com