गडहिंग्लजला ऊसावर हुमणीचा प्रादूर्भाव

गडहिंग्लजला ऊसावर हुमणीचा प्रादूर्भाव

Published on

gad76.jpg
95326
बेळगुंदी : ऊस पिकात हुमणींचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.
---------------------------
गडहिंग्लजला उसावर हुमणीचा प्रादुर्भाव
संततधार पावसाची प्रतीक्षा : नुकसानीमुळे शेतकऱ्यांना चिंता
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : जुलैचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप पावसाला म्हणावा तसा जोर नाही. परिणामी, शेतात हुमणीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यांच्याकडून ऊस पिकाचे नुकसान सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतात पाणी साचून राहिले तर हुमणीचा बंदोबस्त होऊ शकतो. त्यामुळे संततधार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
यंदा मॉन्सून रुसल्याचे चित्र आहे. जून महिना असा-तसाच गेला आहे. जुलैचा पहिला आठवडा संपला तरी अद्याप पावसाला जोर नाही. पावसाची उघडझापच सुरू आहे. श्रावण नसला तरी उन्ह-पावसाचा खेळ दिसू लागला आहे. पावसाच्या सरी कोसळल्या तरी त्यात म्हणावा तितका जोर नाही. अशा प्रकारचा पाऊस आणि वातावरण किडींच्या वाढीसाठी पोषक ठरते. त्यामुळे एकीकडे पिकांवर किडींचा तर दुसरीकडे जमिनीखाली हुमणींचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. याच पिकाला हुमणीने लक्ष्य केले आहे. उसाच्या मुळाजवळ जमिनीखाली हुमणी दिसू लागली आहे. त्यांच्याकडून मुळे कुरतडल्याने उसाचे नुकसान होत आहे. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांकडून औषध फवारणी केली जात आहे. पण, त्याचा म्हणावा तितका परिणाम साधत नाही. औषध सोडले की हुमणीचे किडे अधिक खोलवर जातात. औषधाची परिणामकारकता कमी झाली की पुन्हा वर येतात. त्यामुळे जोरदार पाऊस हाच यावरील उपाय आहे. संततधार पाऊस झाला तर शेतात पाणी साचते. यात हुमणीचे किडे मरतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संततधार पावसाची अपेक्षा केली जात आहे.
-----------------------
प्रकाश सापळ्यांकडे दुर्लक्ष
उन्हाळ्यात विशेषत: मे महिन्यात काळे भुंगे मोठ्या प्रमाणात असतात. या भुंग्यांपासूनच पुढे हुमणी तयार होते. त्यामुळे काळ्या भुंग्यांचा त्याचवेळी बंदोबस्त करणे गरजेचे असते. यासाठी कृषी विभागाकडून शेतात प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन केले जाते. मात्र, शेतकऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आजुबाजुच्या सर्व शेतकऱ्यांनी मिळून प्रकाश सापळे लावणे आवश्यक असल्याचे सांगत शेतकरी यातून अंग काढून घेताना दिसतात. पण, सुरवात कोणीतरी केली तर आजूबाजुचे शेतकरी तयार होतील. तेच होत नसल्याने सर्वांनाच हुमणीच्या प्रादुर्भावाला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. प्रकाश सापळ्यांच्या तुलनेत कितीतरी अधिक कष्ट, पैसा आणि वेळ हुमणींच्या निर्मूलनासाठी खर्च करावा लागतो, याचा विचार होणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.