शाहू महाराज

शाहू महाराज

Published on

विशाळगड प्रश्‍नी कायदा-सुव्यवस्था बिघडू नये
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज : सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रश्‍न सोडवण्याची गरज
..................
सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. ९ : विशाळगडावर अतिक्रमणाबरोबरच आरोग्याचाही प्रश्‍न आहे. अतिक्रमण हा प्रश्‍न केवळ एका घटकाला लागू होत नाही, तो सर्वांना लागू होतो. अतिक्रमण असेल तर प्रशासन त्यावर योग्य कारवाई करेल. पण, यावरून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, अशी अपेक्षा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
विशाळगडावरील अतिक्रमण, त्याविरोधात माजी खासदार संभाजीराजे यांनी घेतलेली बैठक व हिंदुत्‍ववादी संघटनांची आक्रमक भूमिका या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. या प्रश्‍नावर आपण लवकरच जिल्हाधिकारी व संबंधित घटकांशी चर्चा करून प्रश्‍न समजावून घेऊ, असेही ते यावेळी म्हणाले.
ते म्हणाले, ‘सर्वांनी एकत्र बसून हा विषय सोडविण्याची गोष्ट आहे. न्यायप्रविष्ट बाब असली तरी सर्वांनी एकत्र येत हा विषय मिटू शकतो. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये हा मुद्दा आहे. गडावर स्वच्छताही राखली पाहिजे. किती आणि कोणत्या लोकांची अतिक्रमणे आहेत याची माहिती आहे, जी खरोखरच अतिक्रमणे आहेत ती प्रशासानाने काढावीत.’
पुढील दोन महिन्यांत केंद्र सरकार पडणार, या माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रासद यादव यांच्या वक्तव्याबाबत ते म्हणाले, ‘पुढे काय घडामोडी होतील त्यावर सत्ताबदल अवलंबून आहे. शासन हे होऊ नये यासाठी प्रयत्न करेल आणि हे सहजासहजी तसे होणार नाही. पूर्वी मोदी सरकार होते. आता एनडीए सरकार आहे. त्यामुळे बदल होणे अवघड आहे.’
केंद्रात विरोधी पक्ष हा मजबूत असला पाहिजे आणि आता तो आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याकडे परिपक्वता आहे. म्हणूनच सर्वांनी त्यांना विरोधी पक्ष नेतेपदी निवडले आहे. शिवाजी महाराजांच्या वाघनख्यांबद्दल संशोधन होणे गरजेचे आहे. इतिहास संशोधकांनी सातत्याने हे संशोधन करावे, असेही ते म्हणाले.
..............
दिल्लीचा अनुभव वेगळा
पहिल्यांदाच संसदेत पोहोचलेल्या शाहू महाराज यांनी दिल्लीचा अनुभव वेगळा असल्याचे यावेळी सांगितले. एकापेक्षा एक मंडळी तिथे असतात. सर्वजण अभ्यासू आहेत. त्यातून चांगली माहिती मिळण्यास मदत होते, असेही ते यावेळी म्हणाले.
...........
ते एकत्र येत असतील तर चांगलीच गोष्ट
सध्‍या राज्यात दोन आघाड्या कार्यरत आहेत. महाविकास व महायुतीकडून सामान्यांचे प्रश्‍न सुटतीलच; पण तिसरी आघाडी झाली तरी त्यांच्याकडूनही प्रश्‍न सुटतील. संभाजीराजे व आमदार बच्चू कडू एकत्र येत असतील तर चांगलीच गोष्ट असल्याचे शाहू महाराज यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.