रेल्वे प्रवासी गैरसोय

रेल्वे प्रवासी गैरसोय

Published on

पंढरपूर यात्रेला जादा रेल्वेगाड्या सोडा
प्रवाशांची मागणी : मासिक पासधारकांना स्लिपर कोचमध्ये मनाई

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. ९ : नोकरी- वसायानिमित्ताने रेल्वे प्रवास करणाऱ्यांना मासिक पासधारक व जनरल प्रवाशांना स्लिपर कोचमध्ये बसण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच यात्रा-जत्रांसाठी जादा रेल्वे गाड्यांची व्यवस्था करणे टाळले आहे. यातून रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यावर उपाययोजना करण्यात रेल्वे प्रशासनाने हात आखडता घेतल्याने रेल्वे प्रवाशांच्या मनस्तापात भर पडत आहे. दरम्यान, पंढरपूर यात्रेसाठी जादा गाड्या सोडा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
अनेक रेल्वे प्रवासी मासिक पास काढून प्रवास करतात. यात दीर्घ पल्ल्याच्या गाड्यातून जातात तेव्हा स्लिपर कोचमध्ये बसल्यानंतर ही जागा आरक्षित आहे, असे सांगून त्यांना स्लिपर कोचमधून जनरल डब्यातून प्रवास करायला लावला जातो. यापूर्वी मासिक पासधारकांनाही स्लिपर कोचमधून प्रवासाची मुभा देण्यात येत होती. तर काही वेळा फरकाची रक्कम घेऊन रितसर पावती देऊन स्लिपर कोचमधून प्रवास करण्याची मुभा होती. हीच मुभा सध्‍या रद्द केल्याचे रेल्वेचे पर्यवेक्षक प्रवाशांना सांगत आहेत. यावरून वादाचे प्रसंग उद्‍भवत आहेत. कोल्हापूर ते सातारा या मार्गावर सर्वाधिक प्रमाणात असा अनुभव येत आहे. याबाबत रेल्वे प्रवासी संघटनाही रेल्वे प्रशासनासोबत चर्चा करीत आहेत. मात्र, यावर अद्यापी रेल्वे प्रशासनाने तोडगा काढलेला नाही.
आषाढी एकादशीला पंढरपूरच्या यात्रेसाठी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. यात काहीजण दिंड्यांसोबत पायी जातात तर काहीजण एसटीने जातात. अनेकवेळा एसटीला गर्दी असते, जागा मिळत नाही, अशी स्थिती असते. रेल्वे प्रशासनाकडून देशात विविध ठिकाणी यात्रा, सण व सुटीच्या काळात जादा गाड्या सोडण्यात येतात. मात्र, पंढरपूर यात्रेसाठी जादा गाडी सोडण्यात रेल्वे प्रशासनाने हात आखडता घेतला आहे. यापूर्वी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अनेक वेळा कोल्हापूर दौऱ्यावर येऊन गेले, तेव्हा त्यांनी पंढरपूर यात्रेला जादा गाड्या सोडण्यासाठी विचार करू, एवढेच मोघम उत्तर दिले. खासदारांनाही याबाबत एक दोनवेळा विषय काढला. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी, पंढरपूरला जाताना-येताना प्रवाशांना मोठी गैरसोय सोसावी लागत आहे.
...
प्रवाशांनी दाद मागायची कोठे?
रेल्वे विभागीय व्यवस्थापकांनी मागील महिन्यात येथे भेट दिली तेव्हा त्यांनी अमृत भारत योजनेतील कामाची पाहणी केली. तसेच प्रवासी हिताच्या सुविधा द्या, अशा सूचनाही रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, कोल्हापूर- मिरज-सातारा या मार्गावर अधिक गैरसोयी सोसाव्या लागत आहेत. याबाबत प्रवाशांनी काही तक्रारी केल्या किंवा मागण्या केल्या तरी पुणे विभागीय कार्यालयाकडे बोट दाखविले जाते. त्यामुळे प्रवाशांनी दाद मागायची कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.