लाखांच्या जनावरांचाही रूपयांतच कर

लाखांच्या जनावरांचाही रूपयांतच कर

Published on

लाखांच्या जनावरांचाही रुपयांतच कर
गडहिंग्लज बाजार समिती : बाजारभाव व्यवहारानुसार वसुलीकडे दुर्लक्ष
दीपक कुपन्नावर ः सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावर बाजारात होणाऱ्या म्हशींसह शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारातून वसूल होणारा कर जनावरांच्या मूळ किमतीनुसार होत नसल्याने या बाजाराचे उत्पन्न ‘जैसे थे’च आहे. जनावर लाखाच्या किमतीने विकली तरी कर पावतीला मात्र अजूनही म्हशीचा दर १० हजार तर शेळ्या-मेंढ्यांचा दर ३ हजार रुपयेच लावला जात आहे. प्रशासनाकडूनच अशी वसुली होत असल्याने जनावरांच्या बाजाराचे उत्पन्न ‘जैसे थे’च असून त्याचा परिणाम समितीच्या उत्पन्नावर होत आहे.
वास्तविक दोन दशकांत जनावरांचे दर दुप्पट-तिप्पट होऊनही ना पशुपालक खरी किंमत नोंदवत आहेत, ना प्रशासनाकडून त्याबाबत कार्यवाही केली जात आहे. साहजिकच जनावरांच्या बाजाराचे दहा वर्षापासून उत्पन्न आहे तेथेच थांबले आहे. परिणामी, अंदरबट्यातील समितीला अशा कारभाराने गतवैभव कसे मिळणार असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. येथील बाजार समितीची अस्तित्वासाठी झुंज सुरू आहे. सीमाभागातील ही मोठी बाजार समिती आवक घटल्याने दीड दशकाहून अधिक काळ तोट्यात आहे. कर्मचाऱ्यांचे तब्बल ३० महिन्यापासून वेतन थांबले आहे. समितीला वाचवण्यासाठी निवडणूक बिनविरोध झाली असली तरी, ये रे माझ्या मागल्या असेच कामकाज सुरू असल्याचे चित्र आहे.
प्रत्येक जनावरांच्या खरेदी-विक्री व्यवहारामागे विक्रीच्या किमतीवर शेकडा १ रुपये ५ पैसे समितीला कर भरावा लागतो. आज घडीला म्हशींची किंमत ४० हजारांपासून लाख-दीड लाखापर्यंत आहेत. यामुळे सरासरी ४०० ते दीड-दोन हजारांपर्यंत कर भरावा लागतो. शेळ्या-मेंढ्याची किंमत सरासरी १० हजारवर आहे. पण, प्रत्यक्षात पशुपालक अधिक कर टाळण्यासाठी म्हशींसाठी केवळ दहा तर शेळी-मेंढीसाठी ३ हजार रक्कम पावतीला सांगतात. अलीकडील काही महिन्यात झालेल्या म्हशींच्या विक्रमी व्यवहाराने कर आकारणीच्या या प्रकारावर प्रकाशझोत पडला. त्यामुळे एका म्हशीमागे केवळ शंभर तर शेळ्या-मेंढ्यासाठी ३० रुपयेच बाजार समितीला कर रूपाने मिळतात. प्रत्यक्षात बाजारभावाच्या किमतीनुसार कर मिळणे आवश्यक आहे. पण, पशुपालकांची कजूंशी आणि प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्षामुळे जनावरांचे दर वाढूनही उत्पन्न वाढलेले दिसत नाही. एकीकडे आवक घटल्याने उत्पन्न घटल्याची ओरड तर दुसरीकडे हक्काच्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष हेच पिछेहाटीचे कारण आहे.
----------------
कर्मचाऱ्यांचा पगार भागेल
प्रत्यक्ष बाजारभावाप्रमाणे जनावरांच्या किमतीची नोंदणी करून त्यापद्धतीने कर संकलीत केल्यास तिपटीने उत्पन्न वाढू शकते. सध्या दर रविवारी सरासरी पाच हजारांचे उत्पन्न मिळते. ते तिपटीने वाढल्यास महिन्याला साधारण साठ हजार तर वर्षाला ७ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळू शकेल. त्यामुळे दोन वर्षांपासून वेतनासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या १५ कर्मचाऱ्यांचे दरवर्षी दोन महिन्याचे वेतन जनावरांच्या बाजारातून भागू शकते. यामुळे संस्थेची नाजूक अवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज असली तरी त्याला पशुपालकांचाही समुजतदारपणा आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.