खर्गे

खर्गे

Published on

खुर्ची वाचविण्यासाठीच
मोदींच्या गावात चकरा
खर्गे : महाविकास सत्तेवर येणारच

सकाळ वृत्तसेवा
शाहू नाका, ता. १७ : ‘पन्नास खोके एकदम ओके’ म्हणणाऱ्या महायुतीच्या सरकारला जनता कंटाळली आहे. या निवडणुकीत सर्व खोकेवाले घरी जाणार असल्याने खिळखिळी झालेली सत्तेची खुर्ची वाचविण्यासाठीच पंतप्रधान तालुका, अगदी गावपातळीवर चकरा मारत आहेत. यापूर्वीचे पंतप्रधान कधीही इतके फिरलेले नाहीत, असा टोमणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज येथे लगावला.
प्रचार दौऱ्यासाठी येथील विमानतळावर आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘भाजपच्या पराभवासाठी सर्वजण एकत्र आलो असून, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. महाराष्ट्राला सक्षम, स्थिर सरकार देऊ,’ असा विश्वासही व्यक्त केला.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘झांशीमध्ये लहान मुलांचे जीव जात आहेत. मणिपूरमध्ये लोकांची घरे जाळली जात आहेत. बलात्कार होत आहेत. तेथील राजकारणी महाराष्ट्राच्या प्रचारासाठी फिरत आहेत. ही निवडणूक महाराष्ट्राची असल्याने येथील जनता कुणाला मत द्यायचे ठरवेल.’
ते म्हणाले, ‘मी ५४ वर्षांपासून राजकारणात आहे; पण आम्ही कधी राज्याच्या निवडणुकीत उतरलो नव्हतो. राज्य पातळीवरील नेत्यांच्या माध्यमातूनच प्रचार केला जात होता; पण आता पंतप्रधान, मुख्यमंत्री, अनेक मंत्री प्रचाराला येत आहेत. आता पंतप्रधान परदेशात गेले. त्यांना देशवासीयांबाबत काही प्रेम नाही. समस्या सोडविण्यासाठीचे काही उपाय माहिती नाहीत. सक्षम प्रशासन व्यवस्थेसाठी तुमच्या हाती सत्ता दिली आहे; पण त्यांचे बहुमताचे सरकार नसल्याने ते स्वतःच्या पायावर उभे नाहीत. त्यामुळे असलेल्या भीतीतून बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, अशा बाता मारत, ईडी, प्राप्तीकर, सीबीआयमार्फत धमकावले जात आहे. अशा पद्धतीने घाबरवूनच त्यांनी महाराष्ट्रात चोरांचे सरकार बनवले आहे. त्यांना घालवून आम्ही एक चांगले सरकार देणार आहे.’
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, कर्नाटकचे आमदार हसन मौलाना, उत्तर विधानसभेचे निरीक्षक सुखविंदर ब्रार, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे, सरलाताई पाटील, भारती पोवार, आदी उपस्थित होते.

कोट
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अजूनही निश्चित नाही. त्यावर आता वेळ वाया घालवणार नसून, महाविकास आघाडीतील सर्व नेते मिळून आम्ही मुख्यमंत्री ठरवू. आमच्यात कोणताही वाद नसेल. घोडेबाजार होऊ नये म्हणून मजबूत लोकांनाच उमेदवारी दिली आहे. ते खोकेवाल्यांसारखे जाणारे नाहीत.’’
- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस अध्यक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com