रंकाळा चौपाटीवरील अतिक्रमित टपऱ्या हटविल्या

रंकाळा चौपाटीवरील अतिक्रमित टपऱ्या हटविल्या
Published on

35266
--
रंकाळ्यावरील अतिक्रमित
टपऱ्या हटविल्या
महापालिकेकडून कारवाई; अन्य अतिक्रमण न काढा, टपरीचालकांचा आंदोलन इशारा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : रंकाळा चौपाटीवर अतिक्रमण केलेल्या टपऱ्यांवर आज महापालिकेच्या अतिक्रमण व इस्टेट विभागाकडून धडक कारवाई केली. यात तीन टपऱ्या काढून ताब्यात घेताच उर्वरित सर्व १४ टपऱ्या संबंधितांनी स्वत:हून काढल्या. यावेळी महापालिका कर्मचारी, टपरी चालक व नागरिकांमुळे परिसरात मोठी झाली. कारवाईवेळी पोलिस बंदोबस्त होता. दरम्यान, रंकाळ्याभोवतीची अन्य अतिक्रमणे न काढल्यास आंदोलन करू, असा इशारा या टपरीचालकांनी दिला.
ताराबाई रोडवरून चौपाटीवर जाण्यासाठी असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बेकायदेशीरपणे टपऱ्या लावल्या होत्या. काल त्याचा उद्घाटन समारंभ होता. परंतु हे अतिक्रमण असल्याने कोणीही फिरकले नाही. हे समजल्यानंतर महापालिकेकडून संबंधितांना या टपऱ्या हटविण्यास सांगितले होते. परंतु त्या हटविल्या नाहीत. आज सकाळी दहा वाजता उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्या नेतृत्वाखाली गांधी मैदान कार्यालय, अतिक्रमणविरोधी विभाग व इस्टेट विभागाचे २५ हून अधिक कर्मचारी दाखल झाले व टपऱ्यांवर कारवाई सुरू केली. तीन टपऱ्या कर्मचाऱ्यांनी हटविल्या. दुपारी साडेबारापर्यंत ही कारवाई पूर्ण झाली. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर यांनी भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला. यावेळी टपरीचालकांनी रंकाळ्याभोवतीचे फेरीवाल्यांचे अतिक्रमण न काढल्यास सात दिवसांनी पुन्हा येथे टपऱ्या लावू, असा इशारा दिला. यावर मस्कर यांनी या ठिकाणी सर्व्हे करून अतिक्रमणे काढली जातील, असे आश्‍वासन दिले.
--
आम्ही चोऱ्या-माऱ्या
तर करत नाही...
रंकाळ्याभोवती असलेल्या इतर फेरीवाल्यांचे अतिक्रमण दिसत नाही का? त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण दिसत नाही का? आम्ही पोटासाठी करतोय, चोऱ्या माऱ्या तर करत नाही? अशा तीव्र भावना टपरीचालकांनी व्यक्त केल्या.
................................
कोट...
अतिक्रमण केलेल्या काही टपऱ्या महापालिकेकडून कारवाई करत ताब्यात घेतल्या. त्यानंतर तातडीने संबंधितांनी स्वत: हून उर्वरित टपऱ्या काढून घेतल्या. रंकाळ्याभोवती असणाऱ्या अतिक्रमणाबाबत सर्व्हे करून बेकायदेशीर टपऱ्या काढल्या जातील.
- महादेव फुलारी, उपशहर अभियंता
-
युद्धामुळे परिसरातील अनेकांच्या नोकऱ्या व रोजगार गेले आहेत. त्यांची कुटुंबे चालावीत यासाठी हा खाऊ गल्लीचा प्रकल्प राबविला होता. परंतु काही लोकांना यात वाटा पाहिजे होता. त्यामुळे त्यांनीच वरिष्ठ यंत्रणेला सांगून हा प्रकार केला. परंतु आम्ही थांबणार नाही, जनआंदोलन उभे करू.
- योगेश मांडरेकर, टपरीचालक

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com