कागणीत कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद

कागणीत कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद

02026
कोवाड : कोवाड उपकेंद्रातील सहायक अभियंता अजित कांबळे यांना निवेदन देताना कागणीचे शेतकरी.
------------
कागणीत कृषी पंपांचा वीजपुरवठा बंद
शेतीच्या पाण्याचा आठ दिवसांपासून प्रश्‍न : सुरळीत करण्याचे आश्‍वासन
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. ३० : किटवाड (ता. चंदगड) फिडरवरील कागणी हद्दीतील नदीकाठावरील कृषिपंपांचा वीजपुरवठा आठ दिवसांपासून बंद झाला आहे. यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
उन्हाचा पारा वाढत असल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे तत्काळ वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी कागणी परिसरातील ग्रामस्थांनी महावितरणकडे निवेदनातून केली आहे. महावितरणचे सहायक अभियंता अजित कांबळे यांनी वादळी पावसात विद्युत खांब व वाहिन्यांची मोडतोड झाल्याने वीजपुरवठा खंडित केल्याचे सांगून लवकरच वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाचा महावितरणलाही फटका बसला आहे. पावसात विद्युत खांब व वाहिन्या तुटल्या आहेत. साधारण कोवाड व कुदनूर परिसरात ४० खांब मोडून पडले आहेत. किटवाड फिडरवरही तीच स्थिती आहे. विद्युतपुरवठा खंडित करून महावितरणने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. पण, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामात व्यत्यय येत असल्याचे दिसत आहे. वीजपुरवठा बंद असल्याने कृषिपंप बंद आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. महावितरणने जादा कामगार लावून दुरुस्तीची कामे पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. उसाला आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे लागते. या आठवड्यात वेळेत पाणी नसल्याने उसाच्या रंगात बदल झाला आहे. काही शेतकऱ्यांनी खतांचे डोस दिले आहेत. लागण केलेल्या उसाची रोपे कोमेजून जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरू करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर सरपंच सुहास बामणे, अभिषेक कोरे, नरसिंग बाचुळकर, प्रथमेश देसाई, सागर राजगोळकर, अमृत देसाई, सुरेश शिदगौंड, मारुती हगिदळे, सतीश भोगण यांच्यासह शेतकऱ्याच्या सह्या आहेत.
-------------
वादळी पावसात विद्युत खांब मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. कागणी हद्दीतील पडलेले विद्युत खांब उभारण्याचे काम आज सुरू केले आहे. दोन दिवसांत काम पूर्ण होताच कृषिपंपांचा विद्युतपुरवठा सुरळीत होईल.
-अजित कांबळे, सहायक अभियंता, कोवाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com