राजर्षी शाहू महाराज चित्ररथ अनावरण बातमी

राजर्षी शाहू महाराज चित्ररथ अनावरण बातमी

69322,69323
...
राजर्षींचा समतेचा विचार युवा मनात रुजणार
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ःचित्ररथाचे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य एव्हरेस्टपेक्षा मोठे आहे. त्यांनी मांडलेला समतेचा विचार चित्ररथाच्या माध्यमातून राज्यभर जाणार आहे. युवा मनानमध्ये हा विचार रुजवला जाईल. शाहूंच्या कार्याचा चित्ररथ राज्याच्या प्रगतीचा रथ ठरेल,’ असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. आज ऑनलाईन पद्धतीने त्यांनी राजर्षी शाहूंच्या जीवनावर आधारित चित्ररथाचे अनावरण केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती होती.
दसरा मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने सांस्कृतिक मंत्रालयाने हा चित्ररथ बनवला आहे. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातही हा चित्ररथ जाणार आहे. चित्ररथाच्या अनावरणानंतर मंत्री मुनगंटीवार म्हणाले, ‘कोल्हापूर ही नररत्नांची भूमी आहे. राजर्षी शाहू महाराजांचा राज्यकारभार समानतेची शिकवण देणार होता. देशामध्ये अनेक राजे झाले. मात्र राजर्षी शाहू महाराज हे दुर्बल घटकांचा आवाज बनले. त्यांच्या जीवनकार्यावर बनवलेला हा चित्ररथ प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचे कार्य करेल. युवा मनांमध्ये या चित्ररथमुळे समतेच्या विचाराची रुजवण होईल.''
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,‘सांस्कृतिक मंत्रालयाचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. राजर्षी शाहू महाराजांचे राज्य सर्वधर्मीयांचे आणि अठरापगड जातींचे होते. त्यांनी शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. वसतीगृहे सुरू केली. त्यामुळे कोल्हापूर प्रागतिक विचारांचे बनले. राधानगरी धरणामुळे जिल्हा सुजलाम सुफलाम झाला. त्यांचे हे कार्य युवा पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी चित्ररथ एक प्रभावी माध्यम ठरेल.’ सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले. शाहीर रंगराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाड्यातून राजर्षी शाहू महाराजांची महती सांगितली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, सांस्कृतिक कार्य संचनलालयाचे सहसंचालक श्रीराम पांडे, पुराभिलेख सहाय्यक संचालक दिपाली पाटील, शाहीर राजू राऊत यांच्यासह मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
...
... म्हणून मी मंत्री झालो
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार कोल्हापुरात रुजला. म्हणूनच माझ्यासारखी अल्पसंख्यांक समाजातील व्यक्ती पाच वेळा आमदार आणि मंत्री झाली. राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली. त्यामुळे देशाला संविधानकार मिळाले.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com