सोयाबीनपेक्षा भुईमुगाकडे शेतकऱ्यांचा कल

सोयाबीनपेक्षा भुईमुगाकडे शेतकऱ्यांचा कल

Published on

सोयाबीनपेक्षा भुईमुगाकडे शेतकऱ्यांचा कल
लहरी हवामान, घटते उत्पादन, दराच्या अनिश्‍चिततेमुळे पाठ
अनिल केरीपाळे : सकाळ वृत्तसेवा
कुरुंदवाड, ता. ४ : एकेकाळी सोयाबीन पीकपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या शिरोळ तालुक्यात सोयाबीन पीकपेरा मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. सोयाबीनऐवजी भुईमुगाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
लहरी हवामान, घटत चाललेले उत्पादन व दराची अनिश्‍चितता यामुळे शेतकरी सोयाबीनकडे पाठ फिरवत आहे. आजअखेर केवळ साडेतीनशे हेक्टर क्षेत्रांत सोयाबीनची पेरणी झाली आहे. १५०० हेक्टरपर्यंतच पेरणी होण्याची शक्यता असल्याचे तालुका कृषी अधिकारी टी. ए. जांगळे यांनी सांगितले.
शिरोळ तालुक्यात ऊस पिकाखालोखाल सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायची. मुबलक पाणी व कष्ट उपसणारा शेतकरी यामुळे सोयाबीनचे अमाप पीक शिवारात डोलायचे. एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन घेण्याचा येथील शेतकऱ्यांनी विक्रम नोंदवला. मे महिन्यात पेरणी करायची अन् ऑगस्टमध्ये मळणी करायची व लगेचच ऊस लागवड करण्याचा शिरस्ता अनेक वर्षे पाहायला मिळायचा. कुरुंदवाड, जयसिंगपूर ही हक्काची बाजारपेठ. मळणी झाल्यानंतर शिवारातच सोयाबीनचे व्यापारी यायचे व रोख पैसे देऊन सोयाबीन खरेदी करायचे. त्यामुळे शेतकऱ्‍यांना पावसाळ्यातच पुढील शेतीकामासाठी पैसे मिळायचे.
मात्र, मध्यंतरी तांबेरा रोगाच्‍या प्रादुर्भावाने सोयाबीन पिकाचे होत्याचे नव्हते झाले. तरीही शेतकऱ्‍यांनी हिमतीने पीक घेतले. मात्र, दराची घसरण सुरू झाली तसा शेतकरी सोयाबीन पिकापासून दूर जाऊ लागला. दहा वर्षांपूर्वी असलेला ३५०० ते ४००० या दरात अपवाद वगळता कधीच वाढ मिळाली नाही. एखाद वेळेस आठ ते नऊ हजार दर मिळाला. मात्र, चार ते साडेचार हजारांवर दर चढेना उत्पादन खर्च वाढत राहिला. बियाणे, खते, औषधे महागली. मात्र, दर वाढेना. शिवाय उत्पादनातही घटच सुरू राहिल्याने शेतकरी सोयाबीन पीक लागवडीपासून दूर राहत असल्याचे चित्र दिसत आहे.
शिरोळ तालुक्यात खरीप हंगामात बहुतांश सर्वच भागात सोयाबीनचे क्षेत्र हजारो हेक्टरांत दिसायचे. मात्र, यंदा आजअखेर केवळ साडेतीनशे हेक्टरमध्‍ये पेरणी झाली असून, आणखीन हजार ते बाराशे अशी एकूण जेमतेम १५०० हेक्टर क्षेत्रांत पेरणी होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे.
सोयाबीन क्षेत्र कमी होत असताना भुईमूग क्षेत्रात मात्र चांगली वाढ होत आहे. यंदा १५०० ते २००० हेक्टरपर्यंत भुईमूग पीक होईल असे चित्र आहे. भुईमुगास पाणी कमी लागते, शिवाय रोग किडींचाही विषय फार कमी असतो. तसेच सोयाबीनच्या तुलनेत दर चांगला मिळत. जमिनीचा पोतही सुधारतो. त्यामुळे शेतकऱ्‍यांचा कल भुईमुगाकडे वाढला आहे. आंतर पीक म्हणूनही भुईमूग चालतो, त्यामुळे भुईमूग क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे.
-----------
शिरोळ तालुका सोयाबीन पिकांत अग्रेसर होता ही वस्तुस्थिती आहे. मात्र, यंदा क्षेत्रात घट होताना दिसत आहे. शेतकरी आता सोयाबीनऐवजी भुईमुगाकडे वळत असल्याचे दिसत आहे. शिरोळ तालुक्यात १५०० हेक्टरांत सोयाबीन तर १५०० ते २००० हेक्टरांत भुईमूग होईल, असा अंदाज आहे.
-चंद्रकांत जांगळे, कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.