
वनमित्र संस्थेच्या वतीने गडकोटांच्या सानिध्यात शिवजयंती बातमी
सिद्धनेलीः कागलच्या वनमित्र संस्थेसह विविध संघटनांतर्फे रत्नागिरीतील किल्ले रत्नदुर्गमध्ये स्वच्छता अभियान करून शिवजयंती करण्यात येईल. गडकोटांच्या सान्निध्यात शिवजयंतीचे बारावे वर्षे आहे. यामध्ये शिवराज्य मंच, संभाजी ब्रिगेड, जय शिवराय तरुण मंडळ करनूर, गीता गोशाळा काटेभागाव व महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी संघटनाही सहभागी होतील. अभियान शनिवारी (ता १८)ते रविवारी (ता. १९) असे दोन दिवस होईल. शनिवारी गड स्वच्छता, शाहीर रफिक पटेल व बाबासाहेब नदाफ यांचा ‘शाहिरी जलसा’, किल्ले संवर्धन तसेच राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा होईल. रविवारी गडपूजन, गडदर्शन, शिवजयंती उत्सव पालखी सोहळा, किल्ले पूर्णगड व पावस दर्शन होईल. कागलमधून शनिवारी सकाळी सहा वाजता प्रस्थान आहे. शिवभक्तांनी स्वतःच्या वाहनाने येण्यासाठी नावनोंदणीचे आवाहन केले आहे. त्यांची भोजन सोय केली जाईल. अधिक माहितीसाठी अजित पाटील, अशोक शिरोळे, इंद्रजीत घाटगे,विक्रम चव्हाण, नाना बरकाळे आदींशी संपर्क साधावा.