शिरोली : दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तालुकानिहाय व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

शिरोली : दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तालुकानिहाय व्यवसाय मार्गदर्शन शिबिर

दहावी अनुत्तीर्णांसाठी कौशल्य मार्गदर्शन
तालुकानिहाय आयोजन; राज्य शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. १४ : राज्यातील दहावीच्या निकालातून सुमारे आठ ते नऊ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण (किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोहोचण्यास अडसर) होत असल्याचे निकालातून दिसून आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांवर आधारित व्यवसाय मार्गदर्शन, पुढील शिक्षणाची दिशा आणि समुपदेशन करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी तालुकानिहाय व्यवसाय मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्यात सद्यःस्थिती दरवर्षी साधारणपणे १७ ते १८ लाख विद्यार्थी माध्यमिक स्तरावर इयत्ता दहावीमध्ये अध्ययन करतात. या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात येते. हे विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांची करिअरच्या दिशेने पुढील टप्पा सुरू होतो. या परीक्षेत साधारणपणे सरासरी ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. तर राज्यातील जवळपास आठ ते नऊ टक्के विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत पोचण्यास अडसर निर्माण होत आहे. अशा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध कौशल्य आधारित, व्यवसाय मार्गदर्शन, तसेच पुढील शिक्षणाच्या दिशा आणि समुपदेशनाचे आयोजन विविध शासकीय, अशासकीय संस्था आणि शिबिरे, उद्‌बोधन आयोजित करणे आवश्यक असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी यावर्षीपासून शालेय शिक्षण विभाग कौशल्याधारित उपक्रमांची सुरुवात करण्यात येत आहे. यात प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना (माध्यमिक) माध्यमिक स्तरावरील जिल्ह्यातील सर्व शाळांच्या दहावीच्या निकालाचे विश्‍लेषण करणे, तसेच संख्यात्मक दृष्टिकोनातून किमान अध्ययन क्षमता पातळी प्राप्त करून न शकणाऱ्या शाळांची यादी (तालुकानिहाय) तयार करणे, असा आदेश शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिला आहे.
प्रत्येक तालुक्यात उद्‌बोधन सत्रशाळांमधील दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील दिशा, व्यवसाय कौशल्य विकास किंवा अन्य आनुषंगिक उद्‌बोधन याकरिता मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एका उद्‌बोधन सत्राचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना शिक्षण विभागाने दिली आहे.
----------------
कोट
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करण्याचा आणि पुढील शिक्षणासाठी समुपदेशन करण्याचा निर्णय अभिनंदनीय आहे.
- आर. एस. पाटील, अध्यक्ष, सूर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ, शिरोली पुलाची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com