इचलकरंजीतील पाणी प्रश्नी उद्या बैठक

खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा : जिल्हाधिकारी कार्यालयात होणार चर्चा
 Ichalkaranji corporation
Ichalkaranji corporationsakal

इचलकरंजी : इचलकरंजीतील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणा-या दोन्ही योजना सातत्यांने कुचकामी ठरत आहेत. नवीन योजनांचे भवितव्य विरोधामुळे अधांतरी आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (ता.१३) सांयकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती राजर्षी शाहू सभागृहात व्यापक बैठक होणार आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या पत्रानुसार ही बैठक पार पडणार आहे.

शहरातील सद्या पाण्याचा प्रश्न गुंतागुंतीचा होत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी प्रमुख कृष्णा योजना गळतीमुळे कुचकामी झाली आहे. या योजनेच्या सक्षमीकरणाचे काम रेंगाळले आहे. त्यामुळे गळतीच्या प्रश्नामुळे सातत्यांने शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. तर पंचगंगा योजनेतून अत्यंत कमी प्रमाणात पाणी उपलब्ध होते. तर प्रदुषणानंतर पाणी उपसा करण्यावर मर्यादा पडतात. त्यामुळे शहरातील नागरिकांना सातत्यांने तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.

यावर पर्याय म्हणून नवनविन पाणी योजना राबविण्याचे प्रस्ताव आले. तत्कालीन भाजप शासनाने इचलकरंजीसाठी वारणा योजना मंजूर केली होती. मात्र ग्रामीण भागातील विरोधानंतर ही योजना बारगळली. त्यानंतर विद्यमान महाविकास आघाडी शासनाने दुधगंगा योजनेस तत्वतः मान्यता दिली. मात्र ही योजना तातडीने अद्याप आकारास आलेली नाही. यामुळे इचलकरंजीतील पाणी प्रश्न जैसे थे आहे. आजही मुबलक पाण्यासाठी शहरवासियांना संघर्ष करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पाणी प्रश्नावर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी व्यापक बैठक घेण्याची मागणी खासदार माने यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे केली. त्यानुसार उद्या (बुधवार) बैठक होत आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी हेमंत निकम यांनी बैठकीचे पत्र जारी केले आहे. यामध्ये खासदार माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी नगरसेवक मदन कारंडे, सागर चाळके, शशांक बावचकर, राहूल खंजीरे, रविंद्र माने, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, महादेव गौड, उदयसिंग पाटील, प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, प्रताप होगाडे, तनाजी पोवार यांच्यासह यांना बैठकीसाठी निमंत्रीत केले आहे.

बैठकीतील निर्णयाकडे लक्ष

पुढील दीड-दोन महिन्यांचा काळ उन्हाळ्याचा आहे. तोंडावर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका आहे. त्यामुळे पाणी प्रश्न हा अति संवेदनशील होत आहे. पाणी प्रश्नाबाबत नागरिकांतही रोष आहे. राजकीय नेतेमंडळींचा यामध्ये कस लागणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत होणा-या निर्णयाकडे शहरवासियांचे लक्ष असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com