Krushi kanya : चिकाटीला कष्टाची जोड; रेणुकाताईंची शेती अजोड

भाजीपाला, डाळिंब पिकाची साथ; यशस्वितेचा आदर्श
Krushi kanya
Krushi kanya sakal

आटपाडी : शेती म्हणजे कष्टाचं काम. त्यातही भाजीपाला व फळपीक घेणं म्हणजे मोठा खर्च, कष्ट आणि तेवढीच जोखीम. एवढं सारं करूनही हातात काहीच पडलं नाही तर परवड ठरलेलीच. मात्र आटपाडीच्या रेणुकाने जोखीम घेत काळ्या आईची सेवा एक व्रत म्हणून केलीय. गेली दशकभर त्यांनी हा डाव खेळत वेगळेपण सिद्ध केलेय.

येथील रेणुका श्रीकृष्ण सागर (सागर मळा) सर्वसामान्य घरातील सावित्रीची लेक. वडील शिक्षक, त्यामुळे शेतीचा कसलाही संबंध नव्हता. सर्वसामान्य घरासारखे वातावरण असूनही त्यांनी एम. ए., बी. एड.पर्यंत शिक्षण घेतले. आटपाडीतील श्रीकृष्ण सागर यांच्याशी जन्मगाठ बांधली गेली. पती ट्रॅक्टरद्वारे भाड्याने मशागतीची आणि मळणी मशिनची कामे करतात. सासरी अवघी वीस गुंठे शेतजमीन. अल्पभूधारक असल्याने सततची आर्थिक ओढाताण ठरलेली. स्वतःच सक्षम झाल्याशिवाय या चक्रव्यूहातून बाहेर पडणे अशक्य वाटू लागले.

त्यातून मार्ग शोधताना रेणुका शेतीकडे वळल्या. स्वमालकीच्या शेतीत भाजीपाला घेण्यास सुरवात केली. भाजीपाला शेतीत कष्ट व जिद्दीच्या जोरावर बारा महिने माल पिकू लागला. थोडी आर्थिक घडी बसू लागली. त्यानंतर जवळच असलेले पाच एकर क्षेत्र आठ वर्षांपूर्वी कराराने घेतले. त्यातही बऱ्यापैकी यश मिळाले. पुन्हा आणखी तीन एकर शेती कराराने घेतली. पाच एकरात डाळिंबाची सोळाशे झाडे लावली, तर स्वतःच्या शेतात ढबू मिरची, भेंडी, दोडका, कलिंगड, खरबूज अशी भाजीपाला पिके घेत हा रथ पुढे जाऊ लागला.

उच्च शिक्षण घेतल्याने वाचनाची आवड होतीच. शेतीशी संबंधित पुस्तके उपलब्ध करून ज्ञान मिळवले. शेतीच्या पुस्तकांचे ग्रंथालयच त्यांनी केले आहे. त्या आधारेच त्या भाजीपाला आणि फळपिकांचे नियोजन करतात. शेतीच्या कामाला पतीचा कसलाही हात लागत नाही. केवळ बागेसाठी औषधे आणून देण्याचे काम करतात. फवारणी मात्र स्वतः करतात. इंजिन सुरू करून स्वतः औषध फवारणी करतात. स्वकष्टाने घेतलेला ट्रॅक्टरही चालवतात. भाजीपाला, फळपिकांना ‘ठिबक’ने पाणी आणि विद्राव्य खते सोडतात.

विद्युत पंप सुरू करून प्रत्येक प्लॉटला नियोजनानुसार पाणी देतात. गरजेनुसार मजूर महिला सोबतीला घेतात. डाळिंबाची छाटणी, अंतर्गत मशागत, औषध फवारणी यापासून ते विक्रीपर्यंत स्वतः पुढे असतात. शेतातून मिळालेल्या पैशांचे नियोजनही त्याच करतात. भाजीपाला, डाळिंबाचे सारे बारकावे आत्मसात केले आहेत. एका देशी गायही त्यांनी पाळली आहे.

निसर्गाच्या अवकृपेचा फटका

गेले तीन वर्षे प्रतिकूलतेमुळे डाळिंब बागा धोक्यात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गतवर्षी अवर्षणामुळे त्यांना जबर फटका बसला. सोळाशे झाडांसाठी पाच लाख रुपये खर्च केले. मात्र खर्चाच्या तुलनेत अत्यल्प उत्पादन मिळाले. त्यापूर्वीही त्यांचे नुकसान झाले आहे. तो फटका सोसूनही जोमाने शेतीत सक्रिय आहेत. पतीच्या भक्कम पाठबळावर त्यांचे हे धाडस आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com