राज्यात यंदा सर्वाधिक कपाशी लागवड; अन्नधान्याच्या पेरणीतही महाराष्ट्र आघाडीवर 

Maharashtra is leading in cotton sowing and food grain sowing in the state this year
Maharashtra is leading in cotton sowing and food grain sowing in the state this year

माळीनगर (सोलापूर) : यंदा खरिपात देशात कापूस लागवड दुपटीने वाढली आहे. यंदा 91.67 लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. गतवर्षी 45.85 हेक्‍टर क्षेत्रात कापूस लागवड झाली होती. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 28.51 लाख हेक्‍टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली असल्याचे केंद्र सरकारच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत समोर आले आहे. 

देशात मान्सूनने यंदा समाधानकारक हजेरी लावल्याने गतवर्षीच्या तुलनेत खरीप पेरणीच्या क्षेत्रात जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. यंदा तीन जुलैअखेर देशात 433 लाख हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 203 लाख हेक्‍टर क्षेत्रात अधिक पेरणी झाली आहे. प्रामुख्याने भात, डाळी, मका, सोयाबीन, कापूस, बाजरी या पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. 

देशातील खरीप पेरणीचे साधारण क्षेत्र 1063.64 लाख हेक्‍टर इतके आहे. चालू वर्षी 432.94 लाख हेक्‍टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. गतवर्षी या कालावधीत 230.03 लाख हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. महाराष्ट्रात डाळी, तेलबिया, अन्नधान्य, ऊस व कापसाची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मध्य प्रदेशात तेलबियांची तर छत्तीसगडमध्ये भाताची सर्वाधिक लागवड झाली आहे. 

यंदा 68.08 लाख हेक्‍टर क्षेत्रात भात लागवड झाली आहे. गतवर्षी 49.23 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड झाली होती. यंदा छत्तीसगड मध्ये सर्वाधिक 9.02 लाख हेक्‍टर क्षेत्रात भात लागवड झाली आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश 4.44, बिहार 3.94, मध्य प्रदेश 3.80, हरियाणा 2.91 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. डाळींची पेरणी यंदा 36.82 लाख हेक्‍टर क्षेत्रात झाली आहे. गतवर्षी या काळात अवघी 9.46 लाख हेक्‍टर डाळींची पेरणी झाली होती. महाराष्ट्रात डाळीचे सर्वाधिक 11.94 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. 

अन्नधान्याची 70.69 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये मका, बाजरीची पेरणी अधिक आहे. गतवर्षी 35.20 लाख हेक्‍टर क्षेत्रात अन्नधान्याची पेरणी झाली होती. यंदा त्यात दुपटीने वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 11.45 तर त्याखालोखाल मध्य प्रदेशात 10.45 लाख हेक्‍टर क्षेत्रावर अन्नधान्याची पेरणी झाली आहे. तेलबियांची 109.20 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी हे क्षेत्र 33.63 लाख हेक्‍टर इतके होते. यंदा त्यात साडेतीन पट वाढ झाली आहे. त्यामध्ये सोयाबीनची पेरणी अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com