Sangli Politics : काँग्रेसमध्ये बंड होणार? विश्‍वजित कदम यांच्यावर मोठी भिस्त, संशय बळावल्याने घडामोडीकडं भाजपचं लक्ष

आणीबाणीच्या कालखंडानंतरच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) देशभरात काँग्रेसला फटका बसला असतानाही इथे काँग्रेस कधी पराभूत झाली नाही.
Mahavikas aghadi Loksabha Election Sangli
Mahavikas aghadi Loksabha Election Sangliesakal
Summary

सध्या काँग्रेसची ही जागा ठाकरे शिवसेनेकडून काढून घेणे हेच आव्हान आहे. चंद्रहार पाटील यांचा ठाकरे गटातील नियोजित प्रवेश पाहता, हे आव्हान अधिक बिकट वाटत आहे.

Sangli Politics : एकूण सतरा वेळा लोकसभेचे मैदान मारणाऱ्या काँग्रेसला (Congress) जागा तरी लढवायला मिळणार का, हा सध्या चर्चेचा प्रश्‍न आहे. ज्या वसंतदादांच्या घरातून राज्यातील काँग्रेसची तिकिटे वाटली जायची, त्यांच्या नातवाला पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात नव्हे, पक्षाबाहेरच्या नेत्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, ही जिल्ह्यातील जुन्या काँग्रेसप्रेमींची खंत आहे.

यशवंतराव, राजारामबापू, वसंतदादा, गुलाबराव, शिवाजीराव देशमुख, विष्णुअण्णा, पतंगराव कदम ते अगदी मदन पाटील अशा अनेक काँग्रेस नेत्यांच्या मांदियाळीच्या या पक्षाची ही गलितगात्र अवस्था केवळ नव्या पिढीतील नेतृत्वाचे अपयशच अधोरेखित करीत नाही, तर त्यांची आव्हानांपासून पळून जायची भूमिकाही दाखवून देते. नेतृत्वाच्या पोकळीत काँग्रेसची आंधळी कोशिंबीर सुरू आहे.

Mahavikas aghadi Loksabha Election Sangli
Jayant Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सुन्न शांतता; जयंत पाटलांच्या 'करेक्ट कार्यक्रमा'कडं राज्याचं लक्ष!

आणीबाणीच्या कालखंडानंतरच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) देशभरात काँग्रेसला फटका बसला असतानाही इथे काँग्रेस कधी पराभूत झाली नाही. त्या पक्षाचा आज महाआघाडीच्या जागावाटपात जागा टिकवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ज्या वसंतदादांनी मुंबईत शिवसेनेला बळ दिले, त्या शिवसेनेकडून जागा मिळवण्यासाठी काँग्रेसला ‘मातोश्री’चे उंबरठे झिजवावे लागत आहेत. हे लक्षण आत्मविश्वास हरवल्याचे आणि नेतृत्व करण्याच्या इच्छाशक्तीच्या अभावाचे आहे. आज सर्वांत गंभीर बाब काय असेल, तर पक्षातील बिनीचे शिलेदारच मुळी पक्षात राहतील की नाही, याबद्दल सतत साशंकता व्यक्त होत आहे.

Mahavikas aghadi Loksabha Election Sangli
Mahavikas aghadi Loksabha Election Sangli

काँग्रेसला अंतर्गत मतभेद नवे नाहीत. उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये इतकी चुरस असायची की, शेवटच्या क्षणी प्रचार कार्यालयासाठी थाटलेला मांडव मोहनराव कदम यांना काढावा लागला होता. आता त्याच पक्षात ‘तू लढ... तू लढ’ असे साकडे एकमेकाला घातले जात आहे. त्याचवेळी अमुक नेता आपल्यासमवेत निवडणूक प्रचारापर्यंत राहील का, याची भीती एकमेकांना वाटतेय. यावेळी काँग्रेसमध्ये विशाल पाटील (Vishal Patil) लढतील, हे एव्हाना स्पष्ट झालेय. मात्र प्रचाराची रणनीती ठरायची वेळ आली, तरी ही जागा काँग्रेसला सुटेल, याची निश्चिती नाही. एवढे होऊनही आजघडीला काँग्रेसच संपूर्ण मतदारसंघात लढू शकतो, हेही वास्तव आहे.

Mahavikas aghadi Loksabha Election Sangli
Prakash Ambedkar : 'वंचित'च्या राज्यस्तरीय धोरणाची 'ती' यशस्वी लिटमस टेस्ट ठरली; आता पुन्हा तो परिणाम दिसणार?

किंबहुना काँग्रेसचा उमेदवार कोण ठरतोय, यावर भाजपश्रेष्ठींही आपले फासे टाकतील, असे दिसत आहे. भाजपची ‘वेट अँड वॉच’ची ही भूमिकाही काँग्रेसची ताकद अधोरेखित करणारी आहे. भाजपने जे काही इथे कमावलेय, ते काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात करूनच. त्यामुळे हीच परंपरा पुन्हा सुरू राहतेय की काय, अशी विद्यमान खासदारांना धास्ती आहे.

पतंगरावांच्या पश्‍चात जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्या गळ्यात सर्व काँग्रेसजनांनी टाकली आहे. हे प्राप्त करण्यासाठी पतंगरावांना खूप मोठा संघर्ष करावा लागला होता. आता ‘सांगली’ काँग्रेसच लढेल, असे सतत सांगण्याची वेळ विश्‍वजित यांच्यावर येणे ही त्यांच्यासाठीही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. सध्या समाजमाध्यमांवर काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांबाबत वर्तवल्या जाणाऱ्या शक्यता एकूण राजकारणातील कमालीचा संभ्रम स्पष्ट करणारी आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारीबद्दल काहीही चमत्कार घडू शकतो, अशा आशयाच्या प्रतिक्रिया काँग्रेसबाबत आणखी संभ्रम वाढवत आहेत. दुर्दैवाने काँग्रेसकडून त्याचे ठोसपणे खंडण होत नाही.

Mahavikas aghadi Loksabha Election Sangli
Loksabha Election : शिवसेनेचा 'चंद्रहार' कोणाच्या गळ्यात? 'कोल्हापूर' काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात 'सांगली'ची दिली आहुती!

सध्या काँग्रेसची ही जागा ठाकरे शिवसेनेकडून काढून घेणे हेच आव्हान आहे. चंद्रहार पाटील यांचा ठाकरे गटातील नियोजित प्रवेश पाहता, हे आव्हान अधिक बिकट वाटत आहे. अशावेळी काँग्रेसमध्ये बंड होईल का, याकडे भाजपचे लक्ष आहे. सध्या काँग्रेसची मोठी भिस्त विश्‍वजित कदम यांच्यावर आहे. दोन ते तीन विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. विशाल पाटील, जयश्री पाटील, विक्रमसिंह सावंत, पृथ्वीराज पाटील अशा काँग्रेसच्या एकूण एक नेत्यांनी त्यांना नेतृत्व बहाल केले आहे. विशाल पाटील तर गेले अनेक दिवस विश्वजित यांच्या नेतृत्वाखाली मी लढत आहे, असं वारंवार सांगत आहेत. सांगली लोकसभेची उमेदवारी मिळवण्यापुरती नव्हे, तर ती जिंकण्याची जबाबदारीही विश्‍वजित यांच्यावर असेल. संशयाला पूर्णविराम देऊन येत्या काळात त्यांना आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी लागेल. ते त्यांच्यावर विसंबून असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com