बेळगाव - शहराच्या पश्चिम आणि उत्तर भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली मार्कंडेय नदी मैली होत आहे. या नदीत परिसरातील नागरिकांकडून पात्रात कचरा व मृत जनावरे, धार्मिक विधीचे साहित्य टाकले जात आहे. यामुळे नदीचे पाणी निळे व काळ्या रंगाचे झाले आहे. याकडे प्रशासन व पर्यावरण संघटनांनी लक्ष देऊन नदीला वाचविण्याची मागणी होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यानंतर सुमारे सहा महिने मार्कंडेय नदी वाहते, पण फेब्रुवारीत नदी पुन्हा कोरडी होते. ही नदी बैलूर (ता. खानापूर) पासून सुरु होऊन काकती भागात वाहत जाते. या नदीवर शिरूर धरण बांधले असून नदीच्या पात्रादरम्यान लहान-मोठे बंधारे बांधून पाणी अडविले आहे. पावसाळ्यात हिंडलगा पंपिंग स्टेशनच्या माध्यमातून या नदीचे पाणी शहराला दिले जाते.
दरवर्षीच्या पावसाळ्यात नदीचे पात्र बाहेर येत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यंदा पंधरा दिवस पात्राबाहेर पाणी आल्याने भात पीक कुजून शेतऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दरवर्षी जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला नदी आटते. बंधारे असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतो.
नदी पात्रातील पाण्याचा रंग निळा झाल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
नदीपात्रात मृत जनावरे
नदीच्या काठावरच प्लास्टिकचा कचरा टाकला जात आहे. तसेच नदीतच मृत जनावरे टाकली जात आहेत. बैलूर, राकसकोप, बेळगुंदी, कल्लेहोळ, उचगाव, मण्णूर, आंबेवाडी, हिंडलगा, कंग्राळी, जाफरवाडी, कडोली, काकती, होनगा भागातील शेतकऱ्यांना नदीचा फायदा होतो.
शहरातील नाल्याचे पाणी नदीला जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कचरा व मृत जनावरे नदीत टाकली जात आहेत. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.
- सरस्वती पाटील, सदस्या, जि.पं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.