बेळगाव - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी आवश्यक त्या सूचना कराव्यात अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या कडे केली आहे.
कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथे आलेल्या शरद पवारांची समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तसेच विविध विषयांवर चर्चा केली. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत समिती नेत्यांबरोबर चर्चा करून काही महत्वपूर्ण निर्णय घेतले होते. या निर्णयांची सुनावणीची तारीख येण्या अगोदर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याकरिता आवश्यक त्या सूचना संबंधिताना कराव्यात अशी मागणी केली तसेच गेल्या महिन्यापासून सीमाभागात कन्नड संघटना व प्रशासनाकडुन सुरू असलेल्या अन्यायाची तसेच वस्त्रोद्योग मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर याना झालेली अटक व खासदार संजय राऊत यांना पोलिसांनी दिलेली वागणूक याबाबत पवार यांना माहिती दिली.
यावेळी पवार यांनी आपल्याला अन्यायाची माहिती असून याबाबत संबंधीत मंत्री व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या जातील असे आश्वासन दिले. यावेळी मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, प्रकाश पाटील, सुनील आनंदाचे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालक मंत्री सतेज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.