सांगली :देशात मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर केल्यानंतर अत्यंत अडचणीत सापडलेला दूध व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर यायला लागला आहे. बाजारपेठा खुल्या झाल्यानंतर उपपदार्थांची मागणी संथगतीने वाढत आहे. आता हॉटेल व्यवसायही खुला झाल्याने त्याची बाजारपेठ काहीसा वेग पकडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिल्लक दुधापासून निर्माण केलेल्या दूध पावडरचा प्रश्न मात्र आजही कायम आहे.
दूध आणि दुधापासून बनणाऱ्या दही, ताक, तूप, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, बटर या उपपदार्थांची मागणी लॉकडाउनमध्ये एकाएकी थांबली. घरगुती दूध वापर होता; मात्र हॉटेल बंद झाले, सार्वजनिक कार्यक्रम थांबले, चहाचे गाडे बंद झाले. त्यामुळे सुमारे 25 टक्क्यांपेक्षा अधिक वाटा बंद झाल्या. त्यामुळे दुधाची खपत थांबली.
त्यामुळे पावडर निर्मितीशिवाय पर्याय राहिला नाही. त्यात पावडरचे दर कोसळले. 300 रुपये किलोची पावडर 204 रुपयांपर्यंत खाली आली. ती पुन्हा सावरायची असेल, तर आंतरराष्ट्रीय बाजारात उठाव व्हायला हवा, तो अजूनही होताना दिसत नाही. त्यातच पावडरचा साठा किती काळ करायचा? त्यावरचा खर्च आला, त्यातील गुंतवणूक आली. ती भरून काढताना व्यावसायिकांची कसरत सुरुच आहे. त्यात बाजारपेठा पूर्ववत होणे आणि महत्त्वाचे म्हणजे हॉटेल व्यवसाय खुला करणे ही दूध व्यवसायासाठी महत्त्वाची गोष्ट ठरली आहे.
चितळे दूध डेअरीचे संचालक गिरीश चितळे म्हणाले, "सारेच अजून सावरलेले नाही; मात्र ते सावरायच्या मार्गाला लागले आहे. वेळ लागेल; मात्र आता खात्री वाटू लागली आहे. दूध व उपपदार्थांचा ग्राहक संपला नव्हता, तो लॉकडाउनमुळे थांबला होता. आजही काही ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, तर त्या भागातील व्यवसायावर परिणाम होतोच. हा सार्वत्रिक परिणाम एकत्र केला तर तो मोठा दिसतो. त्यामुळे हळूहळू सारे ठीक होईल, अशी आशा आहे.'
वातावरण अडचणीचे
सध्या वातावरणात चक्रावून टाकणारे बदल दिसताहेत. अचानक मुसळधार पाऊस येतो, मध्येच ऊन पडते, धुके दाटते. या साऱ्याचा परिणाम दुधाच्या उपपदार्थ बाजारावर होतो. मुंबईत तो त्रासदायक नाही; मात्र पुण्यात फरक जाणवतो, असे श्री. चितळे यांनी स्पष्ट केले. अर्थात, आता घसा जपला पाहिजे आणि त्यासाठी थंड टाळले पाहिजे, ही नाहक भीती कमी झाल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरवाढ... अनिश्चित
दूध व्यवसायावर गेल्या सहा महिन्यांत मोठा भार पडला आहे. उठाव नव्हताच; शिवाय पावडरसाठा, बटरसाठा जपण्यासाठी मोठा खर्च झाला. कमी कामगारांत काम करावे लागले. साहजिकच, अर्थकारणावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे उपपदार्थांची थोडी दरवाढ होऊ शकते का, या प्रश्नावर श्री. चितळे यांनी "अजून ते चर्चेत नाही, मात्र चर्चा होऊ शकते,' असे स्पष्ट केले.
आकड्यांत स्थिती
संपादन : युवराज यादव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.