किल्लेमच्छिंद्रगड (जि. सांगली) : कोरोना काळात मानवी जीवनाची गाडी काही निट चालेना असेच दिसतंय. वर्षातून एकदा खरीप धान्य, कडधान्यापासून आणि नगदी समजल्या जाणाऱ्या ऊस पीकापासून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्याच्या प्रपंचाचा गाडा चालत असे. कधी निसर्गाने दगा दिलाच तर नियमित आणि हक्काचे पैसे देणारा शेतीस जोडधंदा म्हणून केला जाणारा दुध व्यवसाय त्याचा तारणहार ठरत असे.
पण... गेल्या सहा महिन्यात लॉकडाऊनमुळे दुधाचा खप 40 टक्क्यावर आल्याने दूध संघाचे अर्थकारण संकटात आले आहे. दूधाचा खप कमी झाल्याने शिल्लक दूधाची पावडर होवून गोदामे भरुन पडली आहेत. सध्य स्थितीत दहा दिवसाची दोन बिले संघाकडे शिल्लक राहित्यानंतर एक बिल शेतकऱ्याच्या हाती येत आहे. दहा दिवसाला हमखास दूधाचे चार पैसे हाती येणे थांबल्याने शेतकऱ्यांचा आठवडा बाजार थांबून मिठमिरचीचे वांदे होवू लागल्याचे दिसत आहे.
येत्या काही काळात अशीच परीस्थिती राहिली तर दूध उत्पादकांची येणारी दिवाळी गोड असणार नाही. पावडरीचा खप झाला नसल्याचे कारण पूढे येवून दिवाळीच्या बोनसला कात्री लागेल असेच चालू घडीवरुन जाणवते. दोन वर्षापूर्वीही अतिरिक्त दूधाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पावडर निर्मिती होवून पडली होती. मंदी हटल्यानंतर जागतिक बाजार पेठेत साडेतीनशे रुपयांच्यापुढे प्रति किलो पावडरीस दर मिळाला होता.
कोरोनाचे संकट निवारण होत जाईल तसे दूध व्यवसायावरील काळे ढग दूर होवून दूध पावडर खपली जाईल. चांगला दरही मिळेल. त्या फायद्यात मागील वर्षाप्रमाणे दूध उत्पादकांना किती वाटा मिळेल हे सांगणे कठीण आहे. तथापी संसाराचे चक्र सुरळीत चालावे यासाठी दहा दिवसाचे दूध बिल वेळेत हाती पडावे, एवढीच दूध उत्पादक शेतकऱ्यांची माफक अपेक्षा, मागणी असल्याचे दिसत आहे.
संपादन : युवराज यादव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.