समाजाचे सत्व हरवले; कार्यकर्ते कसे निर्माण होणार? - प्रा. डॉ. मिलिंद जोशी

समाजाचे सत्व हरवले; कार्यकर्ते कसे निर्माण होणार? - प्रा. डॉ. मिलिंद जोशी
Updated on

मिरज - समाजाचे सत्वच जिथे हरविले जात आहे, तिथे चांगले कार्यकर्ते निर्माण होण्याची प्रक्रिया कशी सुरू राहणार? असा सवाल करून यापुढे चांगले कार्यकर्तेच नव्हे, तर चांगली माणसेही शोधून सापडणार नाहीत, अशी खंत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. माजी आमदार न. रा. पाठक यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते.

‘सामाजिक कार्यकर्त्यांची वानवा’ या विषयावर त्यांनी विवेचन केले. निवृत्त महापालिका अधिकारी सुनील नाईक अध्यक्षस्थानी होते. 

डॉ. जोशी म्हणाले, की सामाजिक कार्यकर्ते हेच समाजाचे संचित असते; पण जिथे समाजाचीच संवेदनशीलता हरविते, जो समाज सेवकांपेक्षा हिरोंना आयडॉल मानू लागतो, तिथे व्यावसायिक कार्यकर्ते निर्माण होतात. अर्थात, याच संकटाला जागतिकीकरण आणि चंगळवादाचीही किनार आहे. जागतिक स्तरापासून गावपातळीपर्यंत चंगळवादाने जी बोगस आर्थिक सुबत्ता निर्माण झाली, त्याचाही दुष्परिणाम चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या दुष्काळ निर्माण होण्यावर झाला. एकीकडे डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अभय बंग, सिंधूताई संकपाळ यांच्यासारखे सामाजिक कार्याचे दीपस्तंभ उभे असताना दुसरीकडे तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांच्या दिखाऊपणाला प्रतिष्ठा मिळते, तिथेच सामाजिक अधःपतनाची प्रक्रिया झपाट्याने सुरू होते. केवळ मी, आणि माझे कुटुंब म्हणत स्वार्थी जीवन जगणाऱ्या या समाजात वाढते वृद्धाश्रम, अनाथाश्रम हे जसे सामाजिक विनाशाचे लक्षण आहे. डॉ. मुकुंदराव पाठक यांनी स्वागत केले. डॉ. सुधन्वा पाठक यांनी आभार मानले. डॉ. बी. टी. कुरणे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमास ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी, माजी आमदार हाफिज धत्तुरे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

कृतज्ञतेला असाही एक सलाम
व्याख्यानाच्या निमित्ताने ट्रस्टला सहकार्य करणाऱ्या अनेकांचे सत्कार करण्यात आले. यात अकरा लाख रुपये देणाऱ्या एका निवृत्त शिक्षकासह अनेकांचा समावेश होता. पण, यात प्रशांत कुलकर्णी यांचा मात्र एका वेगळ्या कारणासाठी सत्कार केला गेला. पाठक ट्रस्टच्या बांधकाम परवान्याची एक फाईल महापालिकेतून नेहमीप्रमाणे चार वर्षे गायब होती. श्री. कुलकर्णी यांचा थेट मुख्यमंत्री फडणवीसांशी संपर्क असल्याने त्यांनी यात लक्ष घातले आणि चमत्कार झाल्याप्रमाणे ही फाईल पुन्हा प्रकट होऊन मंजूरही झाली. एक कार्यकर्ता म्हणून कुलकर्णी यांनी पाठक ट्रस्टच्या कामाविषयी दाखविलेल्या तत्परतेला सलाम म्हणून ट्रस्टने केलेल्या सत्काराने कुलकर्णीही भारावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Special Inspector General of Police ranjankumar sharma
Miraj Kisan Rail latest news
Warna Dam water storage latest report
Sangli land acquisition objections by farmers
Marathi News Esakal
www.esakal.com