मिरज (जि . सांगली) : महाराष्ट्र कोकण आणि कर्नाटकातील हजारो भक्तांना सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घडवणा-या मिरज पंढरपूर या "देवाच्या गाडी' ला यावर्षी प्रथमच ब्रेक लागला. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद असल्याने रेल्वे व एस.टी. बस इतिहासात प्रथमच धावली नाही.
नॅरोगेज ते ब्रॉडगेज अशी अनेक स्थित्यंतरे पाहिलेली "देवाची गाडी' म्हणजे वारकऱ्यांसाठी एक "भक्तीवाहिनी'. अत्यल्प भाडे आणि सुरक्षित प्रवासाचे साधन असलेल्या या गाडीने पंढरीला जाणे ही देखील भक्तांसाठी एक सुखद अनुभूती असते. यावर्षी कोरोनामुळे सगळ्याच आनंदावर विरजण पडले. साहजिकच मिरज स्टेशन आणि बस स्थानक वारकऱ्यांविना ओस पडले.
आषाढी एकादशी म्हणजे लाखो वारकऱ्यांच्यासाठी पर्वणी सोहळा असतो. पांडूरंगाच्या दर्शनासाठी वारकरी दिंडीतून पायी अथवा मिळेल त्या वाहनाने पंढरपूरला जातात. महाराष्ट्र, कर्नाटकातील हजारो वारकऱ्यांसाठी मिरज-पंढरपूर दरम्यान धावणारी "देवाची गाडी' हे हक्काचे साधन. वर्षानुवर्षे पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांचे रेल्वे आणि लाल परीशीही भावनिक संबंध तयार झालेत. आषाढीच्या आधी चार-पाच दिवसांपासून रेल्वे आणि बस स्थानक गर्दीने फुलुन जाते.
सन 1927 मध्ये तत्कालीन बार्शी लाईट रेल्वे कंपनीने मिरज पंढरपूर दरम्यान सुरु केलेल्या नॅरोगेज रेल्वेमुळे वारकऱ्यांसाठी एका हक्काच्या वाहनाची सोय झाली. या गाडीला वारकऱ्यांची प्रचंड गर्दी असे, की गाडीच्या टपावर बसूनही प्रवास केला जाई. नॅरोगेजसारख्या छोट्या मार्गावर छोटे प्रवासी डबे आणि काही काळ वाफेचे तर त्यानंतर काही काळ डिझेल इंजिनवर धावणारी ही रेल्वे अतिशय मंद गतीने धावत असे. पण याच देवाच्या गाडीने वारकऱ्यांच्या मनात श्रद्धेचे स्थान मिळवले. वर्षातील दोनच वाऱ्यांना मिरज रेल्वे स्थानकावरील या गाडीचे उत्पन्न घसघशीत असायचे अनेक वारकरी महिला डोक्यावरून नेल्या जाणाऱ्या तुळशीचेही तिकीट आजही काढतात. हजारो वारकऱ्यांना सावळ्या पांडूरंगाची भेट घडवून आणणा-या या देवाच्या गाडीचे आणि वारकऱ्यांचे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी कधीही न थकता, न थांबता देवाची गाडी कायम धावत राहिली. रेल्वेमार्ग रुंदीकरणासाठी सन 2008 पासून ते 2013 पर्यंत गाडी काही वर्षे बंद राहिली.
या गाडीने याच दरम्यान थोडीफार विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा कोरोनामुळे यावर्षी सक्तीने थांबावे लागले. यात्रा रद्द झाल्याने मिरज स्थानकातून पंढपूरकडे देवाची एकही गाडी गेली नाही. हेच एस.टी.च्या लालपरीबाबत घडले. दरवर्षी वारकऱ्यांसाठी मिरज स्थानकातून शंभर बस धावायच्या. यावर्षी एस.टी. महामंडळाची एकही गाडी यात्रेसाठी गेली नाही. साहजिकच दरवर्षी आषाढीनिमीत्त गजबजलेल्या मिरज रेल्वे आणि बस स्थानकावरील शांतता अस्वस्थ करीत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.