महाबळेश्वरात पर्यटक येण्यावर कोणताही प्रतिबंध नाही ; मात्र...

महाबळेश्वरात पर्यटक येण्यावर कोणताही प्रतिबंध नाही ; मात्र...

सातारा : महाबळेश्वर येथे येण्यास कोणासही प्रतिबंध करण्यात आला नाही. समाज माध्यमात चुकीचा मेसेज फिरत आहे त्यावर विश्वास ठेवू नये, मात्र अत्यावश्यक गरज असेल तरच प्रवास करावा असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

काही दिवसांपुर्वी समाजमाध्यम विशेषतः व्हाॅटसअॅप ग्रुपवर जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर करून " "कोराेनो"  येत्या सोमवार (ता.16 मार्च 2020) पासून  महाराष्ट्राचे मिनी काश्मीर ओळखले जाणारे ठिकाण महाबळेश्वर पर्यटनासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे." असा चुकीचा संदेश फिरविला गेला. खरे तर हा संदेश खाेटा आहे. नागरीकांनी अशा कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये वेळच्या वेळी जिल्हाधिकारी पत्रकार परिषद घेऊन अथवा जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आवाहन करत आहेत. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे कळविण्यात आले आहे. 

दरम्यान अफवा पसरविणाऱ्यावर सायबर कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल.  अफवा पसरविणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची नजर आहे. अथवा कोणाला असे संदेश दिसले तर ताबडतोब प्रशासनाच्या अथवा पोलिसांच्या नजरेस आणून द्यावे जेणे करून अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन ही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

हेही वाचा : साताऱ्यात कोरोनाचा पहिला संशयित

हेही वाचा : भोंदूबाबांना बसवा कायद्याची जरब

महाबळेश्वर पाचगणीच्या पर्यटनाला फटका

भिलार  : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धसका जगभराने घेतला असून, याचे पडसाद आता शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पोचले आहेत. ऐन हंगामाच्या दिवसातच कोरोनामुळे महाबळेश्वर- पाचगणीच्या पर्यटनाला फटका बसल्याने येथील सर्व व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
 
पाचगणी, महाबळेश्वर ही दोन्ही पर्यटनस्थळे नेहमी गजबजलेली असतात. परंतु, मार्चच्या प्रारंभीच हंगाम सुरू होणार याची आस असतानाच अचानक कोरोनाचे संकट धडकले आणि पूर्ण पर्यटन व्यवसायाच कोलमडून गेल्याची स्थिती सध्या निर्माण झाली आहे. तुरळक पर्यटकांची वर्दळ असली तरी सुट्यांच्या काळातील पर्यटकांची संख्या रोडावली आहे.
 
कोरोनामुळे आंतरराष्ट्रीयच नव्हे, तर राष्ट्रीय पर्यटनावरही परिणाम झाला आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात सुट्या असल्याने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पर्यटक पर्यटनासाठी आवडीनुसार आगाऊ आरक्षण करीत असतात. कोरोनाचे वादळ पुणे, मुंबईत घोंघावताना दिसत असल्याने येणाऱ्या पर्यटकांची पावलेही सध्या स्तब्ध झाली आहेत. भीतीने बरेच पर्यटक आपले केलेले आरक्षण रद्द करीत आहेत. शिवाय नवीन आरक्षणावरही परिणाम जाणवला आहे. त्यामुळे हॉटेल व लॉज व्यावसायिक नाराज झाले आहेत.

वाचा : राज्यातील शहरालगतच्या शाळा महाविद्यालयांनाही सुटी

शाळांच्या सुट्यांच्या कालावधीत पाल्यांना नेण्यास येणारे पालकही पर्यटनाचा आनंद लुटतात. परंतु, कोरोनामुळे शाळांच्या परीक्षा आवरत्या घेण्याची लगबग सुरू आहे. बहुतेक शाळांनी मुलांना सुरक्षित त्यांच्या निवासावर स्वतः पोचवण्याचा मानस व्यक्त केल्याने तेही पर्यटन संपले आहे.
 
स्ट्रॉबेरीचे भवितव्य पर्यटन व्यवसायावर असते. पर्यटन व्यवसाय बहरला तर स्ट्रॉबेरी उत्पादकांना आर्थिक फायदा होतो. पण, अगोदर जागतिक मंदी आणि हवामानामुळे शेतकरी कोलमडला असताना कोरोनाने पर्यटनही कोलमडल्याने स्ट्रॉबेरी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. 
कोरोनामुळे पर्यटकांच्या वर्दळीवर नियंत्रण आल्याने महाबळेश्वर, पाचगणी या दोन्ही बाजारपेठा संथ झाल्या आहेत. त्यामुळे व्यापारीही नाराज झाले आहेत. पुस्तकांच्या गावात भिलारमध्येही शुकशुकाट जाणवत आहे. 


""पर्यटक एप्रिल व मे महिन्यात सुट्या असल्याने आगाऊ आरक्षण करीत असतात. मात्र, कोरोनाच्या भीतीने केलेले आरक्षण रद्द करीत आहेत. नवीन आरक्षण तर पूर्णत: बंद केले आहे.'' 
- आदित्य सामंत, हॉटेल व्यावसायिक, पाचगणी. 

""पर्यटक सध्या तरी सहलच नको, म्हणून केलेले आरक्षण रद्द करीत आहेत. पर्यटक कोणताही धोका घेण्यास तयार नसल्याने आम्ही "वेट ऍण्ड वॉच'च्या भूमिकेत आहोत.'' 
- जयवंत भिलारे, भिलारे टूर्स, पाचगणी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com