संगमनेर : ""शिर्डी मतदारसंघ "विकासाचे मॉडेल' म्हणून राज्यात लक्षवेधी ठरत असताना, वर्षानुवर्षे त्यांनी संगमनेरची प्रतिमा "दुष्काळी तालुका' म्हणून पुढे आणण्यात धन्यता मानली. शिर्डीसारखा विकास हवा असेल, तर युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आपण कॉंग्रेसमध्ये राहू नये म्हणून ज्यांनी षडयंत्र रचले, त्यांच्याजवळ राहायला आता कोणी तयार नाही. आपल्या भूमिकेनंतर या पक्षाची काय अवस्था झाली, हे आपण पाहत आहात,'' अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
तालुक्यातील जोर्वे आणि खळी येथे सुमारे सहा कोटी रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ""तालुक्यातील गावांचा समावेश शिर्डी मतदारसंघात झाल्यावर जाणीवपूर्वक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला; मात्र मागील 25 वर्षांत झाला नाही असा विकास साध्य करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शिर्डी मतदारसंघात समावेश असलेल्या, तालुक्यातील गावांना खऱ्या अर्थाने विकास काय आणि कसा असतो, हे दाखवून दिले.''
""वर्षभर 200 टॅंकर सुरू असलेल्या तालुक्यातील जिरायती भागाला पाणी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. निळवंडे कालव्याचा प्रश्न मार्गी लागला. भोजापूर चारी किंवा पिंपळगाव खांडच्या पाण्याचा प्रश्न युती सरकारच सोडवील,'' अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. संतोष रोहोम, शौकत जहागीरदार, रखमा खेमनर, शरद थोरात, गोकुळ दिघे, दिलीप इंगळे यांनी शिर्डी व संगमनेरच्या विकासाची तुलना करीत जोरदार टीकास्त्र सोडले.
|