सांगली ः शुक्रवारी दिवसभरातील कोरोना रुग्णांचा वाढलेला आकडा पाहता पुन्हा एकदा टाळेबंदी लागते की काय या आशंकेने सर्वांना पछाडले होते. मात्र कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता आता शहरात होत असलेल्या गर्दीवर काही निर्बंध आणले पाहिजेत अशी सार्वत्रिक भावना आहे. शहरातील काही व्यापारी व विक्रेत्यांशी या अनुषंगाने संवाद साधला असता अनेक पर्याय चर्चेत आले. प्रशासनाने व्यापारी प्रतिनिधींशी संवाद ठेवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त झाली.
प्रामुख्याने शहरातील पेठांमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत होणारी गर्दी चिंता वाटावी अशीच आहे. दत्त मारुती रस्ता, कापड पेठ, गणपती पेठ, जुने स्टेशन रस्ता, खणभाग, रिसाला रस्ता, एसटी स्थानक परिसर अशा सर्वच रस्ते आणि कापड पेठांमध्ये दिवसभर गर्दी असते. खरेदीचा कालावधी मर्यादित केल्यामुळेही ही गर्दी अधिकच केंद्रित होत आहे. शिवाय या परिसरात सहज म्हणून येणाऱ्यांची संख्या कमी नसते. हेच चित्र कमी अधिक प्रमाणात मिरज आणि कुपवाडमध्येही दिसते. यापुढे पुन्हा टाळेबंदी न लावता पुरेशी दक्षता घेऊन लोकांना कोरोनासोबत जगण्यासाठी तयार करणे गरजेचे असेल. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांनाही शिस्त लावण्यासाठी नव्याने काही निर्बंध-नियम तयार करता येतील का या दृष्टीने सुचना पुढे आल्या.
लोडिंग अनलोडिंगच्या वेळा वेगवेगळ्या ठरवल्या पाहिजेत
वेळेचे बंधनाची ग्राहकाला सवय लावली पाहिजे. गणपती पेठेत लोडिंग अनलोडिंगच्या वेळा वेगवेगळ्या ठरवल्या पाहिजेत. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मार्केट यार्डाकडे प्रशासनाने पुर्ण दुर्लक्ष आहे. आम्ही प्रशासनाने पुढे येऊन अर्थकारण न थांबवता मार्ग काढण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करावी.
- समीर शहा, व्यापारी नेते
भितीचे वातावरण
व्यापारी पेठांमध्ये होणारी गर्दीचा प्रशासनाने अभ्यास करावा. रुग्ण सापडत असल्याने भितीचे वातावरण आहे. व्यापारी प्रतिनिधींशी संवादाचे धोरण ठेवले पाहिजे.
- बाळासाहेब काकडे, व्यापारी व माजी नगरसेवक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.