"एनएसएस'ची शिबिरे पूरग्रस्त गावांत; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय

"एनएसएस'ची शिबिरे पूरग्रस्त गावांत; शिवाजी विद्यापीठाचा निर्णय

सातारा : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसल्याने अख्खी गावेच्या गावे उद्‌ध्वस्त झाली आहेत. त्यांना सावरण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाची शिबिरे पूरग्रस्त गावांत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही शिबिरे डिसेंबरपर्यंत घेतली जाणार असल्याने पूरबाधितांना मदतीचा आधार मिळेल. 
सलग दोन आठवडे झालेल्या अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण या तालुक्‍यांसह काही गावांत तसेच सांगली, कोल्हापूर शहरांसह बहुतांश गावांत महापुराने थैमान केले. त्यामुळे येथील लोकांचे अगणित नुकसान झाले असून, ते न भरून येणारे आहे. महापुरामध्ये सध्या या शहरे, गावांमध्ये प्रचंड अस्वच्छता निर्माण झाली आहे. शेतीसह जलसंधारणाच्या कामांचे प्रचंड नुकसान झाले. महापुरामध्ये निर्माण झालेल्या समस्या निवारणासाठी, मदतकार्य, स्वच्छता मोहिमेसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाची शिबिरे आपत्तीग्रस्त भाग तसेच आपत्तीग्रस्त दत्तक खेड्यांमध्ये घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने नुकताच घेतला आहे. ही शिबिरे 20 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीत घेण्याच्या सूचना आहेत. 
आपत्ती निवारण अभियान, स्वच्छ भारत-स्वच्छ भारत अभियान, शिक्षण व आरोग्य विकास, पर्यावरण संवर्धन व आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण विकास, पाणी व्यवस्थापन यापैकी एका विषयानुसार शिबिराचे आयोजन करावे लागणार आहे. 
महाविद्यालयांकडून मागविली माहिती 
विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सर्व महाविद्यालयांकडून एनएनएसमधील विद्याथ्यांची संख्या, मुले-मुली, शिबिरात सहभागी होणाऱ्या प्राध्यापकांची संख्या, शिबिर भरविणार असलेल्या गावांची नावे, शिबिराचा कालावधी, शिबिरासाठीचे अनुदान, शिबिरातील प्रकल्प यासह विविध माहिती महाविद्यालयांकडून मागविली आहे. 

...असा झाला निर्णय 

सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी येथील कैलास स्मशानभूमीची स्वच्छता केली. या वेळी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्या मनात विचार येऊन गेला की, "शेकडो कुटुंबांची स्मशानावस्था बनली आहे. त्यांची कुटुंबे सावरण्यास, स्वच्छ करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे,' याच विचारातून त्यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाने हा निर्णय घेतला. विद्यापीठाशी संलग्न सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे 250 महाविद्यालयांतील सेवा योजनांची शिबिरे आता पूरग्रस्त गावांत होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com