
सांगली ः राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारी (ता. 23) पासून भरवावेत, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. हा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाची संमती लागणार आहे.
जिल्ह्यात 1 लाख 55 हजार विद्यार्थी या चार वर्गात शिकतात. त्यांचे पालक या संकट काळात संमतीपत्र देतील का, याकडे आता नजरा लागल्या आहेत. एकूणच पाच महिन्यांचा वाया गेलेला काळ, सध्याचे ऐच्छिक धोरण, लवचिकता या पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षाबाबत सरकारला नेमके काय करायचे आहे, याबाबत गोंधळाची परिस्थिती आहे.
राज्यातील शाळा 15 मार्चपासून बंद करण्यात आल्या. गेल्या शैक्षणिक वर्षात पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढे प्रवेश देण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षातील पाच महिने वाया गेले आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा कितीही ढोल वाजवला तरी तो फुसका बार होता, हे कुणीही नाकारत नाही. या शिक्षण पद्धतीत 12 ते 15 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सहभागी नव्हते. त्यामुळे 85 ते 88 टक्के विद्यार्थ्यांचे काय? हा मुद्दा चर्चेत आहे.
शिक्षण सहसंचालकांनी तर घटक चाचणी, सहामाही परीक्षा घेण्याची गरज नाही, असे आदेशच काढले होते. त्यामुळे या शैक्षणिक वर्षाबाबत अजून मोठा गोंधळ आहे आणि त्याबाबत राज्य शासनाचे अस्पष्ट धोरण आहे. अशा टप्प्यावर नववी ते बारावीचे वर्ग विविध अटी व नियमांनी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अर्थात, स्थानिक परिस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीने त्याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे सोमवारी शाळा सुरू झालीच पाहिजे, अशी सक्ती नाही. त्याआधी प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाचे कोरोना काळाची कल्पना असताना मी पाल्यास शाळेत पाठवण्यास तयार आहे, असे संमतीपत्र आवश्यक असणार आहे. किती पालक ते देतील, याकडे लक्ष असेल.
जिल्ह्यात या चार वर्गांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख 55 हजार 421 इतकी आहे. त्यावर 5 हजार 196 शिक्षण आणि 3 हजार 260 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शाळांची संख्या 750 आहे. पैकी मनपा नगरपालिका शाळांत 382, खासगी अनुदानित शाळांत 1 लाख 38 हजार 367, खासगी विनानुदानित शाळांत 16 हजार 159, तर नवोदय विद्यालयात 513 विद्यार्थी शिकत आहेत.
चिंता दहावी, बारावीची
दहावी आणि बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत पालकांना खूप चिंता आहे. नेहमीच्या वेळेत परीक्षा झाल्या, तर बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अवघे 3 महिने, तर दहावीतील विद्यार्थ्यांसाठी साडेतीन महिन्यांचा अवधी आहे. या काळात काय आणि किती शिकवणार? विद्यार्थ्यांवर त्याचा ताण येणार का? खासगी शिकवण्याही या काळात बंद होत्या. त्यामुळे पालक पुरते संभ्रमात आहेत.
संपादन : युवराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.