बेळगाव : आजही सार्वजनिक आरोग्यासंबंधीचे प्रश्न भीषण आहेत. खासकरून आदिवासी आणि दुर्गम भागातील घटक आरोग्याबाबतच्या मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. स्त्रियांचे आरोग्य, कुपोषण, डोळ्यांचे आजार, प्रसूती, कर्करोगसारख्या भयानक आजाराशी लोक झगडत आहेत. त्यामुळे या घटकांसाठी एकल अभियान संस्थेच्या संचालिका व बेळगावातील प्रसिद्ध डॉ. वैशाली कित्तूर यांनी स्वतःला वाहून घेतले. बेळगावातील विविध खासगी रुग्णालयांतील नोकरी त्यागून त्यांनी उपेक्षित घटकांसाठी सहा वर्षांपासून वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कार्य चालविले आहे.
आदिवासी, दुर्गम आणि उपेक्षितांच्या सर्वांगिण विकासासाठी एकल संस्था काम करते. देशात संस्थेच्या एक लाख शाळा आहेत. बेळगाव जिल्ह्यात दीड दशकापासून ही संस्था कार्यरत असून जिल्ह्यात १४० शाळा आहेत. या संस्थेकडून विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाचे धडे, ग्रामविकास, जागरण, संस्कार, आरोग्याबाबत जागृती केली जाते. त्यापैकी आरोग्य विभागाची जबाबदारी डॉ. कित्तूर यांच्याकडे आहेत.
दर महिन्याला दोन आरोग्य शिबिरे घेऊन विनाशुल्क वैद्यकीय तपासणी केली जाते. शिबिरात कोणाला गंभीर आजार किंवा रोग झाल्याचे निदान झाल्यास बेळगाव, धारवाडमधील सरकारी किंवा खासगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत वैद्यकीय उपचार मिळवून दिले जातात. यासाठी चाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतल्याचे डॉ. कित्तूर यांनी सांगितले. यामध्ये डॉ. प्रताप भुदिया, डॉ. अनिल महाजन, डॉ. मीनल जोशी, डॉ. आसावरी संत, डॉ. मिना कामत, डॉ. राजश्री अनगोळकर आणि श्री. अनगोळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
डॉ. कित्तूर यांचे सासरे रमेश कित्तूर आणि सासू गीता कित्तूर डॉक्टर होत्या. कुटुंबाला वैद्यकीय सेवेची किनार असल्यामुळे वैशाली कित्तूर यांनी काही दिवस वैद्यकीय सेवा बजावली. बेळगावातील विविध खासगी रुग्णालयात त्यांनी सेवा बजावली. परंतु, तेथे मन रमले नसल्यामुळे २०१२ मध्ये एकल अभियानाची माहिती मिळाली. संस्थेकडून खानापूर, कारवार, हल्याळमधील १० हजार रुग्णांना केएलई, जिल्हा रुग्णालयातून डोळ्याच्या विकारावर उपचार झाले आहेत. दीडशे शस्त्रक्रिया झाल्या. एकल अभियानमध्ये १६ संचालक असून संस्थेचे अध्यक्ष उद्योजक गिरीश पै आहेत.
हेही वाचा - बापरे! एटीएममधुन बाहेर आला चक्क नाग
"बालपणापासून आर्थिक दुर्बल, गरीब व गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचे शिक्षण घरातून मिळाले. त्यामुळे वेतनातील काही रक्कम, बक्षीस किंवा भेटवस्तू मिळाल्यावर गरजवंतांना देत होते. लग्नानंतरही बदल झाला नाही. सासूंनी ‘एकल’ची ओळख करून दिली. तेथे सामाजिक सेवेसाठी योग्य व्यासपीठ मिळाल्याचे मला वाटते."
- डॉ. वैशाली कित्तूर, संचालिका, एकल अभियान
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.