सांगली : मुंबई, पुण्यासह राज्यभरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडलेला चाकरमानी कोरोना संकटाने गावाकडे परतला. कुटुंब कबेला गावात ठेवूनच तो पुन्हा कामावर रुजू झाला. त्यावेळी त्याची मुले गावातील शाळेत प्रवेश घेतील, सहा हजारावर नवे प्रवेश होतील, असा प्राथमिक अंदाज होता. परंतू, तो फोल ठरला असून चाकरमान्यांची मुले गावात राहिली, मात्र त्यांची शाळा मुंबईतच आहे. तेथूनच ते ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. भविष्यात कोरोनाचे संकट कमी झाले आणि प्रत्यक्ष शाळा भरली तर बघू, अशी त्यांची भूमिका आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे म्हणाल्या, ""प्राथमिक अंदाजानुसार सहा हजाराहून अधिक मुले नव्याने प्रवेश घेतील, असे चित्र होते. कारण, तेवढे लोक गावाकडे आले होते. त्या तुलनेत अत्यंत कमी संख्येने नवीन प्रवेश नोंदवले गेले आहेत. ही मुले मुंबईत इंग्रजी शाळेत शिकतात. त्यांच्या गावाजवळ इंग्रजी शाळा नाहीत, ही मुख्य अडचण समोर आली आहे. शिवाय, या मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात असून काही काळात सारे सुरळित होईल, अशा आशेवर त्यांना प्रवेश घेणे टाळले असावेत.''
चाकरमानी आता हळूहळू आपल्या कामावर परतू लागले आहेत. काही जणांच्या नोकऱ्यांवर गडांतर आले होते. उद्योग, व्यापार व्यवस्थित सुरु झाल्याने त्यांना नवे काम मिळाले, काहींना जुन्या कामावर संधी मिळाली. त्यामुळे तेही परत जात आहेत. अर्थात, कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. दसरा, दिवाळी मोठा सण आहे. या काळात लोक हलगर्जीपणाने वागले तर मोठी लाट परत येऊ शकते, अशी भिती आहे.
त्यामुळे चाकरमान्यांनी आपला कुटुंब कबेला मागे गावाकडे ठेवला आहे. त्यांची मुले गावीच आहेत. ती मुंबईतील शाळेतच शिकताहेत. तिथले शिक्षक त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या परीक्षा होत आहेत. त्यामुळे ही समस्या राहिलेली नाही.
संपादन : प्रफुल्ल सुतार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.