पसरणी घाट देतोय मृत्यूला निमंत्रण 

पसरणी घाट देतोय मृत्यूला निमंत्रण 

भिलार - पाचगणी व महाबळेश्वर या पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या घाटरस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. या रस्त्यांवरील धोक्‍याची चाहूल लागणाऱ्या ठिकाणांवर अक्षरशः मृत्यू वाट पाहतोय, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या दुर्घटना घडण्याअगोदार उपाययोजना करून या घाटरस्त्यांना सुरक्षित करावे, अशी मागणी पर्यटक व वाहनचालकांकडून होत आहे. 

आंबेनळी दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या धोकादायक रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पाचगणीहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बोंडारवाडीजवळच्या वळणावर रस्त्याचा भराव सहा महिन्यांपूर्वी खचल्याने रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अपघातप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. काही दिवसांपूर्वी दोन पर्यटक गाड्यांची समोरासमोर धडक होऊन नुकसान झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी बांबू उभे करून व दगड ठेवून दोरीच्या साह्याने तात्पुरता अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे रस्ताही अरुंद झाला आहे. गेले सहा महिने ही परिस्थिती तशीच आहे. 

याच पद्धतीने पसरणी घाटाचीही सध्या दुरवस्थेने वाट लागू लागली आहे. अनेक ठिकाणी संरक्षक कठडे तुटलेले आहेत. दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर ठिकठिकाणी दरडी कोसळताहेत. मोक्‍याच्या वळणांवरही रुंदीकरणाअभावी धोकादायक स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी शूटिंगचे साहित्य वाहतूक करणारा ट्रक दरीत कोसळून एक जण ठार झाला होता. किती जणांचे बळी घेतल्यानंतर हा घाट दुरुस्त होणार? अशा संतप्त भावना प्रवासी व नागरिकांतून व्यक्त होत आहेत. आंबेनळी घाटाच्या प्रारंभीच मेटतळेजवळ मुख्य वळणावर अरुंद रस्ता असल्याने वाहने सरळ शेजारील घरांवर जात आहेत. या ठिकाणी शेकडो अपघात झाले आहेत. रस्ता रुंदीकरण करून वळण काढण्याची ग्रामस्थांची मागणीही धूळ खात पडून आहे. 

बारमाही पर्यटकांची घाटातून वर्दळ 
पाचगणी व महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी बाराही महिने मुंबई, पुणे तसेच गुजरातसह परदेशातून पर्यटकांची ये-जा असते. वाईचा पसरणी घाट आणि आंबेनळी घाटातून रात्रं-दिवस खासगी प्रवासी वाहने, मालवाहतूक करणारे ट्रक, तसेच लहान मोठी शेकडो वाहने सतत मार्गक्रमण करतात. त्यामुळे आंबेनळी घाट दुर्घटनेतून बोध घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अलर्ट राहून रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com