थकीत कर्ज भरा अन्‌ माफी मिळवा!, प्रतीक्षा परिपत्रकाची

Satara
Satara

सातारा : शासनाने दोन लाखांपर्यंत थकीत असलेल्यांना कर्जमाफी दिली. पण, आता दोन लाखांपेक्षा अधिक रकमेचे पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही लवकरच कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासन घेणार आहे. अशा शेतकऱ्यांनी येत्या 30 जूनपर्यंत थकीत कर्जाची दोन लाखांवरील रक्कम भरायची आहे. त्यानंतरच त्यांना नवीन पीककर्ज मिळणार आहे. शेतकऱ्यांची थकीत रक्कम येत्या सहा महिन्यांत राज्य शासन संबंधित बॅंकेला परत करणार आहे. यासंदर्भात सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण असून, शासनाने परिपत्रक काढून शेतकऱ्यांसह बॅंकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. 


दोन लाखांपर्यंतच्या 2015 ते 2019 अखेरपर्यंतच्या थकीत पीककर्जास महाविकास आघाडीच्या सरकारने कर्जमाफी दिली. त्यानुसार अशा शेतकऱ्यांना नवीन कर्जही उपलब्ध झाले असून, यावर्षी सातारा जिल्ह्यात शंभर टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खरीप पीककर्ज वाटप होण्याची शक्‍यता जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून व्यक्त होत आहे. त्यानंतर नियमित कर्ज भरणारे शेतकरी आणि दोन लाखांपेक्षा अधिक पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार नियमित परतफेड करणाऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी मार्चअखेरपर्यंतच कर्जे भरली आहेत. पण, तरीही काही शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंतची मुदत आहे. नियमित परतफेड करणाऱ्यांना येत्या जुलै, ऑगस्टमध्ये अनुदान मिळणार आहे. ते त्यांच्या खात्यावर जमा केले जाईल. पण, दोन लाखांपेक्षा अधिक पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांबाबत अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा शेतकऱ्यांनाही दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तोच धागा पकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी (ता. 25) कोल्हापुरात नियमित व दोन लाखांपेक्षा जास्त पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी 30 जूनपर्यंत कर्ज भरा आणि कर्जमाफी मिळवा, असे आवाहन केले आहे. पण, कोरोनाच्या या आणीबाणीच्या कालावधीत याबाबतचा शासननिर्णय अथवा परिपत्रक शासनाकडून काढायचे राहिलेले आहे. तसेच अशा शेतकऱ्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालय पातळीवर तयार असूनही ती शासनाने खुली केलेली नाही. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून याबाबत सावध भूमिका घेतली जात आहे. मंत्रिमंडळाच्या पातळीवर हा निर्णय झाल्याचे पश्‍चिम महाराष्ट्रातील मंत्री सांगत आहेत. पण, प्रत्यक्षात बॅंका व जिल्हा उपनिबंधक कार्यालयापर्यंत याचे परिपत्रक येणे गरजेचे आहे. अन्यथा याबाबत संभ्रमाचे वातावरण शेतकऱ्यांत निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सध्यातरी दोन लाखांपेक्षा अधिक पीककर्ज असलेले शेतकरी कर्ज भरण्याच्या मानसिकतेत नाहीत. कारण आम्हाला शासन कर्जमाफी देईल का, याची शाश्‍वती नाही, असे सांगत आहेत. पण, दुसरीकडे पश्‍चिम महाराष्ट्रातील मंत्री मात्र, शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत नियमित व दोन लाखांपेक्षा अधिकचे पीककर्ज भरा आणि कर्जमाफी मिळवा, असे सांगत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आता शेतकरी येत्या 30 जूनपर्यंत नियमित व दोन लाखांपेक्षा अधिकचे पीककर्ज भरेल. त्यानंतर त्यांना खरिपासाठी नवीन कर्ज मिळणार आहे. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांच्यातील संभ्रम कोण दूर करणार, याची उत्सुकता आहे. 

सरसकट सर्वांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करा 

दोन लाखांपेक्षा अधिक पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. त्यासाठी 30 जूनपर्यंत कर्ज भरायचे, असे सांगितले जात आहे. पण, याची यादी तयार असूनही ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे आपले नाव या यादीत असेल का, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. सरसकट सर्वांनाच दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलावडे यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com