बेळगाव मनपा निवडणूक घोळाबाबत पीयूष हावळांचे थेट मंत्रालयात पत्र

udhhav THACKERAY
udhhav THACKERAY

बेळगाव : बेळगाव महानगर पालिका निवडणूक पारदर्शक झाली नाही. यावेळी मोठ्याप्रमाणात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते पीयूष हावळ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या पत्राची दखल घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

हावळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या त्रुटींबाबत सविस्तर लिहिले आहे. मतदारांना, नागरिकांना विश्वासात न घेता, तसेच पारदर्शकता न ठेवता अत्यंत कमी वेळेत घिसाडघाईत निवडणूक प्रक्रिया पार पाडली. वार्ड पुनर्रचना आणि वॉर्ड आरक्षणासंबंधी उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असतानादेखील निकाल येण्याआधी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक लादली.

एकीकडे कोरोनामुळे नैसर्गिक आपत्ती असताना टास्क फोर्सने निवडणूक घेण्यास मनाई केली आहे, तरीही निवडणूक घेण्याची घाई करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून ईव्हीएम मशिनसोबत व्हिव्हिपॅट न जोडल्याने मतदारांना स्वतःचे मत कोणत्या उमेदवाराला गेले हे पाहण्याचा अधिकार मिळाला नाही. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वापरलेली ईव्हिएमसोबत व्हिव्हिपॅटची यंत्रणा महापालिका निवडणुकीच्या वेळी न वापरल्याने सदोष वाटत आहे. याबद्दल जिल्हा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे ३१ ऑगस्ट रोजी तक्रार करूनही त्यासंबंधी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

ईव्हीएमद्वारे मतदान कसे पार पडेल, तसेच ईव्हीएमसोबत व्हिव्हिपॅट जोडणार अथवा नाही, याबाबत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदार, तसेच उमेदवारांना संपूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले. हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याने मतदार याद्या सदोष होत्या. त्यामुळे हजारोंना मतदानापासून वंचित राहावे लागले. अनेक वॉर्डांत दुबार मतदारांची नावे असल्याने बोगस मतदान झाल्याची शंका आहे. शेकडो मृत मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याने, त्याद्वारेदेखील बोगस मतदान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

बेळगाव महानगरपालिका हद्दीबाहेरील नावे मतदार यादीत समाविष्ट करून बोगस मतदान झाले आहे. याचाच अर्थ अनेक नागरिकांकडे दोन ठिकाणचे मतदान ओळखपत्र असण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने संपूर्ण मतदान प्रक्रियेची सखोल चौकशी करून त्या संबंधित संपूर्ण अहवाल जनतेसमोर ठेवण्याची मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.बेळगाव महानगर पलिकेवरील मराठी माणसाची सत्ता संपविण्यासाठी आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा संशय आहे. सीमाप्रश्न आता बेळगावचा केंद्रबिन्दू राहिला नसून, लोक यापासून दूर गेले आहेत, असे खोटे चित्र या माध्यमातून तयार करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com