रब्बीसाठी सांगली कृषी विभागाचे नियोजन; बियाणे, खतांची मागणी

Planning of Sangli Agriculture Department for Rabbi; Demand for seeds, fertilizers
Planning of Sangli Agriculture Department for Rabbi; Demand for seeds, fertilizers

सांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह खते, बियाणांच्या पुरेशा उपलब्धतेसाठी कृषी विभागाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र 2 लाख 57 हजार 692 हेक्‍टर आहे. जिल्ह्यासाठी विविध प्रकारचे 33 हजार क्विंटल बियाणे, 1 लाख 66 हजार 325 टन खतांची मागणी केलेली आहे. ऑक्‍टोबरमध्ये थंडीची चाहूल लागल्यानंतर प्रत्यक्षात रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात होते. जिल्ह्यात 151 गावे पूर्ण रब्बीची गणली जात असली तरी खरीप आणि रब्बी पेरणीच्या गावांची संख्या 251 पर्यंत वाढली आहे. बियाणांची कमतरता, गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्ह्यात 11 पथकांची नियुक्ती केली आहे. हंगामात शाळू ज्वारी, हरभरा, मक्‍याचे क्षेत्र सर्वाधिक असते. 

सांगली जिल्ह्यात भौगोलिकदृष्ट्या पूर्व भागात दुष्काळी, मध्य भागात बागायती, जिरायत आणि पश्‍चिम भागात डोंगराळ भागाचा समावेश आहे. त्यात परतीच्या पावसावर रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र आटपाडी तालुक्‍यात असून शाळू ज्वारीची पेरणी केली जाते. त्यानंतर जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज पूर्व भागात रब्बी हंगामाचे क्षेत्र आहे. 

उत्पादन वाढ, खर्च बचतीची मोहीम 
खरीप हंगाम सन 2020-21 साठीचे नियोजन करण्यात आले आहे. उत्पादनामध्ये वाढ, खर्चात बचत आणि काढणीपश्‍चात व्यवस्थापनासाठी प्रकल्पाधारित पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे. क्रॉपसॅप संलग्न शेतीशाळा, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, कृषी उत्पादन निर्यातवृद्धी, मृद्‌ व जलसंधारण याअनुषंगाने खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. 

खताचे काटेकोर नियोजन... 
राज्यभर खरीप हंगामात युरियाच्या टंचाईला तोंड द्यावे लागले होते. सांगली जिल्हा मात्र त्याला अपवाद राहिला. रब्बीसाठी 1.66 लाख टन रासायनिक खतांची मागणी केली आहे. त्यामध्ये युरिया- 58 हजार 736 टन, डीएपी- 18 हजार 580 टन, एसएसपी- 19 हजार 910, एमओपी- 26 हजार 269, अमोनियम सल्फेट- 5400 टन, मिश्र खते- 37429 टन मागवली आहेत. प्रत्येक महिनानिहाय ऑक्‍टोबर ते मार्चअखेर 17 टक्केप्रमाणे खतांची मागणी केली आहे. 

रब्बीतील प्रमुख पिके 
रब्बी हंगामात शाळू ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल, भुईमूग, तीळ ही प्रामुख्याने पिके घेतली जातात. शाळूचे पीक सर्वाधिक घेतले जाते. शेतकरी प्रत्येक वर्षी बीजप्रक्रिया केलेले बियाणेच वापरतात. यामुळे चांगले उत्पादन मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. काही मोजकेच शेतकरी घरातील बियाणांवर प्रक्रिया करून वापरत असल्याचे चित्र आहे. 

म्हैसाळ, टेंभूतील पाणीसाठा रब्बीला फायद्याचा 
महापुराच्या काळात सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांतील बंधारे पाण्याने भरून घेण्यात आले आहेत. त्यासाठी 1.75 टीएमसी पाणी साठवले आहे. या साठवलेल्या पाण्याचा रब्बीतील 30 हजार हेक्‍टर क्षेत्राला फायदा होणार आहे. यामुळे कमी पावसाच्या काळात या तलावातील पाणी शेतीसाठी परवानगी घेऊन वापरता येणार आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव साठा ठेवण्याची आवश्‍यकता नसल्याने शेतीसाठी त्याचा वापर होऊ शकतो. 

शेती विकासासाठी हे प्रयत्न हवेत... 

  • अपूर्ण सिंचन प्रकल्पांतील पोटकालव्यांना चालना द्यावी 
  • ठिबक, तुषार सिंचन, शेततळ्यांसाठी मागेल त्याला अनुदान देण्यात मिळावे 
  • शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधीची तरतूद वाढवावी 
  • शेतीपंपांना अखंड वीज उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र फिडर उभारावीत 
  • प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी प्रशिक्षण, भांडवल, मार्केटबाबत जागृती व्हावी 
  • त्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना यंत्र खरेदीचे स्वातंत्र्य देऊन अनुदान उपलब्ध करून द्यावे 
  • शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीपूरक व्यवसायांसाठी कमी व्याजाचे कर्ज मिळावे 

संपादन : युवराज यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com